शेवगाव, (प्रतिनिधी) – सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांसाठी अंत्योदयाचा मंत्र घेऊन केंद्रातील भाजपा व महायुती शासनाने विविध कल्याणकारी योजना राबवल्या. या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपा कार्यकर्ता, बुथ प्रमुख मतदारसंघातील ३६५ बूथवर अहोरात्र कार्य करत आहे. भाजपा हा सर्वसामान्यांचा पक्ष असून प्रथम राष्ट्र , हाच उद्देश ठेवून ‘ सबका साथ, सबका विकास ‘ या ध्येयाने काम करत असल्याचे प्रतिपादन आ. मोनिका राजळे यांनी केले.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आखेगाव – कळसपिंपरी -तोंडोली फाटा या चार कोटी रुपये किमतीच्या साडेपाच किलोमीटर रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पागोरी पिंपळगाव ते सोमठाणे नलवडे या सहा कोटी ३७ लाख रुपये किमतीच्या साडेआठ किलोमीटर रस्त्याचे भूमिपूजन त्यांच्याहस्ते करण्यात आले.
भाजपा तालुकाध्यक्ष ताराभाऊ लोढे, बापूसाहेब भोसले, बापू पाटेकर, शिवसेना तालुकाध्यक्षआशुतोष डहाळे, बाबासाहेब किलबिले, आखेगावचे सरपंच शंकरराव काटे, भगवान काटे, ठाकूर निमगावचे सरपंच संभाजी कातकडे, राक्षीचे सरपंच भक्तराज कातकडे, हरिभाऊ झुंबड, डॉ. गणेश धावणे, शिवाजीराव काटे, बालूभाऊ झिरपे, सचिन खंडागळे, शाखा अभियंता पवार, ठेकेदार बाळासाहेब मुरदारे उपस्थित होते.
आ .राजळे म्हणाल्या , आखेगावसह परिसरातील नऊ गावांमध्ये पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावर आहे. पालकमंत्री व खासदार यांच्या समवेत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक लावून ताजनापूर उपसा सिंचन योजनेतून या गावासाठी पाणी देण्याची कार्यवाही करण्यात येईल. प्रश्न कोणीही मांडला असला तरी लोकप्रतिनिधी म्हणून प्रश्न मार्गी लावणे, ही आमची जबाबदारी आहे. या योजनेसाठी राज्याबरोबर केंद्राचा ही निधी आवश्यक असून त्याकरिता पालकमंत्री व खासदार यांच्यासमवेत लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार आहे.