लखनौ – भाजपचे तिकीट मिळूनही काही उमेदवारांनी लढणार नसल्याची भूमिका जाहीर केली. त्यावरून समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपवर निशाणा साधला.
एक पक्ष म्हणून भाजप एवढा कमजोर कधीच झाला नव्हता. आता भाजप नको असल्याचे जनतेव्यतिरिक्त भाजपवालेच म्हणू लागले आहेत, अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली.
भाजपचे नेते नितीन पटेल आणि भोजपुरी अभिनेते पवन सिंह यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लढणार नसल्याचे जाहीर केले. तर, जयंत सिन्हा आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर या भाजपच्या विद्यमान खासदारांनी यावेळी निवडणूक न लढण्याची इच्छा व्यक्त केली.
तिकीट नाकारण्यात आल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांनी राजकारण संन्यासाची घोषणा केली. त्या घडामोडींचा संदर्भ घेऊन अखिलेश यांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली.
काहींनी उमेदवारी मिळण्याआधी इतर कामे महत्वाची असल्याचे बहाणे करून दावेदारी सोडली. कुणी राजकारणापेक्षा खेळाला अधिक गंभीर मानले. तिकीट न मिळाल्याने कुणी राजकीय संन्यास घेतला. कुणी तिकीट नाकारले. भाजपचे असेही दिवस येतील असे कुणाला वाटले होते का, असा तिरकस सवाल त्यांनी केला.