सहारणपूर –उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीने दंगलखोरांना आणि माफियांना मदतच केली. उत्तर प्रदेशच्या पश्चिमेकडील भागात समाजवादी पार्टीने गुन्हेगारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सहारणपूर येथे झालेल्या प्रचार सभेमध्ये केला. उत्तर प्रदेशाला दंगलमुक्त ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सरकारच आवश्यक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
तिहेरी तलाकविरोधी कायद्याचा संदर्भ देऊन मोदींनी “उत्तर प्रदेशातील मुस्लीम महिलांची कोणीही दडपशाही करू नये यासाठी उत्तर प्रदेशात आदित्यनाथ यांचेच सरकार हवे आहे.’ असे जोर देऊन सांगितले.
माफियावादींनी सहारणपूर दंगलीतील दोषींना निवडणुकीत भागीदार केले आहे. संपूर्ण पश्चिम उत्तर प्रदेशच्या बाबतीतही हेच घडले आहे. गुन्हेगारांना वेचून वेचून निवडणुकीला उभे केले आहे. मुझफ्फरनगरमध्ये जे झाले तो एक कलंक होता. मात्र सहारणपूरमध्ये जे होते आहे, ते अतिशय भयंकर आहे. राजकीय संरक्षणात लोकांना कशाप्रकारे लक्ष्य केले जात आहे, याचे सहारणपूर हे उदाहरण आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरपूर दंगल 2013 साली तर सहारणपूर दंगल जुलै 2014 मध्ये झाली होती. उत्तर प्रदेशाला दंगलमुक्त ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारांना तुरुंगात टाकण्यासाठी भाजपचेच सरकार हवे आहे. आदित्यनाथ यांनी गुन्हेगारांना तुरुंगांच्या ऐवजी राजवाड्यात ठेवायला हवे होते का, असा उपरोधिक प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
करोनाच्या साथीच्या काळात मोफत रेशन, मोफत करोनाविरोधी लस मिळण्यासाठीही भाजपचेच सरकार आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या काळात उत्तर प्रदेशला चांगले रस्ते, वाढती संलग्नता, गंगा एक्सप्रेसवे, दिल्ली-डेहराडून एक्सप्रेसवे, दिल्ली यमुनोत्री हायवे, दिल्ली-सहारणपूर चार पदरी महामार्ग आणि सहारणपूर विमानतळासारख्या सुविधा मिळाल्या असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.