नवी दिल्ली :- भाजपने मंगळवारी संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करताना चार राज्यांमध्ये नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली. त्या प्रक्रियेत भाजपने इतर पक्षांमधून आलेल्या नेत्यांना झुकते माप देत मानाच्या खुर्चीवर विराजमान केले.
चालू वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणुकीला सामोऱ्या जाणाऱ्या तेलंगणामधील बदल महत्वपूर्ण मानला जात आहे. तेथील प्रदेशाध्यक्षपदी बंडी संजय कुमार यांच्या जागी केंद्रीय मंत्री जी.किशन रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली.
पंजाब आणि झारखंडच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अनुक्रमे सुनील जाखड आणि बाबूलाल मरांडी यांच्याकडे सोपवण्यात आली. त्याशिवाय, माजी केंद्रीय मंत्री डी.पुरंदेश्वरी यांना आंध्रप्रदेशच्या प्रदेशाध्यक्षा बनवण्यात आले. पुरंदेश्वरी आणि जाखड कॉंग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये दाखल झालेले नेते आहेत.
नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नियुक्तीबरोबरच भाजपने तेलंगणा निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद एतेला राजेंद्र यांच्याकडे सोपवले. ते भारत राष्ट्र समितीला रामराम ठोकून भाजपमध्ये दाखल झाले आहेत.
तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि पंजाबमध्ये भाजपची फारशी राजकीय ताकद नाही. त्यामुळे बाहेरून आलेल्या नेत्यांना महत्व दिल्याने निष्ठावान नेत्यांमधून फारसा नाराजीचा सूर उमटणार नाही. तसेच, पक्षविस्ताराला हातभार लागेल, असा भाजपचा कयास असल्याचे मानले जाते.
केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या चर्चांना खतपाणी…
भाजपने तेलंगणात संघटनात्मक पातळीवर केलेल्या बदलांमुळे केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलांच्या चर्चांना आणखी खतपाणी मिळाले. रेड्डी यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आल्याने त्यांच्याकडून केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री म्हणून कुमार यांना संधी मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.