नवी दिल्ली (वंदना बर्वे) – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर ढकलला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. निकाल लागत नाही तोपर्यंत धीर धरावा, असा सबुरीचा सल्ला भाजप हायकमांडने आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिला असल्याचे समजते.
मुुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेवून राज्यातील विविध मुद्यांवर चर्चा केली. मात्र, उभय नेत्यांच्या या बैठकीत राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अंतिम निर्णय होवू शकला नाही, असे समजते. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. शिवाय, निवडणूक आयोगाचाही निकाल आलेला नाही.
अशात, न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत वाट बघावी, असा सबुरीचा सल्ला हायकमांडने राज्यातील नेत्यांना दिला असल्याचे समजते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तातडीने दिल्ली गाठल्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला मुहुर्त ठरण्याची चर्चा रंगली होती. शिवाय, अर्थसंकल्पापूर्वी विस्तार होईल असे मुख्यमंत्री म्हणाले होते, हे येथे विशेष.
दरम्यान, गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतची आजची बैठक ही मुख्यत: राज्यातील साखर उद्योग आणि सहकार क्षेत्राला उभारी देण्यासाठी होती, असे शिंदे यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. सहकार क्षेत्रात ज्या सुधारणा आणायच्या आहेत, त्यावर शाह यांच्यासोबत चर्चा झाली. आठवड्याभरात महाराष्ट्राला सुखावणारा निर्णय होण्याची शक्यता आहे, अशी आशा सुध्दा शिंदे यांनी यावेळी बोलून दाखविली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गावाचे अर्थकारण अवलंबून असलेल्या सहकारी संस्थांच्या कक्षा रूंदावण्याची योजना केंद्रातील सहकार खात्याने तयार केली आहे. शिवाय, महाराष्ट्राची भौगोलिक स्थिती लक्षात घेता निर्यात कोटा वाढवून देण्याची मागणी पूर्ण होईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.