पिंपरी (प्रतिनिधी) – शहरातील नागरिकांना चोवीस तास मुबलक आणि पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करण्यात यावा, याकरिता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सत्ताकाळात बंदिस्त पवना जलवाहिनी प्रकल्प हाती घेण्यात आला होता. मात्र, सत्ता असूनही मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न सोडविता आला नाही. त्यामुळेच पिंपरी-चिंचवडकरांना पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे, अशी टीका माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित प्रश्नांबाबत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. त्यावेळी बंदिस्त पवना जलवाहिनीचा प्रश्न शेतकऱ्यांशी बोलून सामंजस्याने सोडवू, असे पालकमंत्र्यांनी म्हटलेले आहे. त्यावर साने यांनी ही टीका केली आहे. ते म्हणाले की, महापालिकेचा महत्त्वाकांक्षी असलेला बंदिस्त पवना जलवाहिनी प्रकल्प पालिकेच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी गुंडाळला आहे, याविषयी पालकमंत्र्यांना माहिती दिलेली नाही.
एकीकडे जलवाहिनीचा प्रकल्प सामंजस्याने सोडवू म्हणायचे अन् दुसरीकडे मावळात जलवाहिनीचा प्रकल्प कदापिही होवू देणार नाही, अशी दुटप्पी भूमिका भाजपच्या नेत्यांनी घेतल्याने हा प्रकल्प रेंगाळला. या प्रकल्पाचे राजकारण करुन भाजपने पिंपरी-चिंचवडकरांना चोवीस तास पाणी योजनेपासून वंचित ठेवले आहे. मात्र आता विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्याने भाजपला या प्रकल्पाचा पुळका आल्याचे साने यांनी म्हटले आहे.