कोलकाता- पश्चिम बंगालमधील हिंसाचारग्रस्त भरपारा भागाला आज भाजपच्या शिष्टमंडळाने भेट दिली. गेल्या आठवड्यामध्ये येथे झालेल्या हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला होता. हे दोघेजण पोलिसांच्या गोळीबारात मरण पावल्याचा दावा भाजपच्या शिष्टमंडळाने केला आहे.
माजी केंद्रीय मंत्री आणि बर्धमान दुर्गापूरचे खासदार एस.एस. अहलुवालिया यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळामध्ये नवनिर्वार्चित खासदार एस.एस. अहलुवालियांसह, माजी पोलिस अधिकरी सत्यपाल सिंह आणि पश्चिम बंगालमधील भाजप नेत्यांचा समावेश होता. या शिष्टमंडळाने मयत कुटुंबीयांशी आणि स्थानिक नागरिकांशी चर्चा केली. पोलिसांनी गुरुवारी भाजप कार्यकर्त्यांवरच्या गोळीबारासाठी वापरलेल्या रायफलींचेही निरीक्षण केले,, असे अहलुवालिया यांनी सांगितले.
भातपारामध्ये नव्याने हिंसाचार
पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातल्या हिंसाचारग्रस्त भातपारामध्ये शनिवारी नव्याने हिंसाचार झाला. जमावबंदीचे आदेश लागू असतानाही परस्परविरोधी दोन गटांमध्ये हा हिंसाचार झाला. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांन लाठीमार करावा लागला. भाजपचे तीन सदस्यीय केंद्रीय पथक या भागातून निघून गेल्यानंतर लगेचच हा हिंसाचार झाला. हे पथक निघून गेल्यावर भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर बाटल्या आणि देशी बनावटीच्या हातबॉम्बचा मारा करायला सुरुवात केली. या हिंसाचारादरम्यान कही जण जखमी झाले.
गुरुवारी 24 उत्तर परगणा जिल्ह्यामध्ये भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान 2 जण ठार आणि 11 जखमी झाले होते. यावेळी पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याचा दावा केला होता. आपल्य निरीक्षणांचा सविस्तर अहवाल राष्ट्रपती आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सादर केला जाईल, असेही अहलुवालिया म्हणाले. मात्र ही निरीक्षणे बिनबुडाची असल्याचे तृणमूल कॉंग्रेसने म्हटले आहे. केवळ तणाव वाढवण्यासाठीच भाजपच्या शिष्टमंडळाने ही भेट दिल्याचे तृणमूलचे सरचिटणीस पार्थ चॅटर्जी यांनी म्हटले आहे.
दरम्यान मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि कॉंग्रेसच्या संयुक्त शिष्टमंडळानेही तणावग्रस्त भारुजापारा, जगद्दाल आणि भातपाराला भेट दिली आणि हिंसाचारात दोघांचा मृत्यू होण्याची चौकशी सीबीआयकडून करण्याची चौकशी केली.