जुन्नर: मुख्यमंत्र्यांच्या “महाजनादेश यात्रे’ला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादी राज्यभर शिवस्वराज्य यात्रा काढली आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात आज “शिवस्वराज्य’ यात्रेचा शुभारंभ किल्ले शिवनेरी येथून झाला आहे. राष्ट्रवादीकडून शिवस्वराज्य यात्रेचा चेहरा म्हणून डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे या यात्रेची धुरा सोपवण्यात आली आहे.
नव्या स्वराज्याचा नवा लढा’ अशी घोषणा देत शिवस्वराज्य स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचा प्रारंभ झाला असून जनतेशी संवाद साधण्यासाठी जुन्नर येथील पहिल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ट नेते छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, खा. अमोल कोल्हे, राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, आ. विद्या चव्हाण आणि मेहबूब शेख, रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, ईश्वर बाळबुधे, पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष फौजिया खान यांनी फडणवीस सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. या सरकारने महाराष्ट्राला अधोगतीला नेऊन ठेवले असून सर्वांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली आहे, महिलांना स्वातंत्र्य राहिले नाही, शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या मनिषा काटे यांनी या सरकारने अटक केली. यातूनच सरकारला विरोध आवडत नाही हे दिसून येते. महाजनादेशासाठी निघालेल्या मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. आता या सरकारला उलथून टाका, अशा शब्दात फौजिया खान यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.
प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी देखील सभेला संबोधित करत सरकारला खडे बोल सुनावले. महाराष्ट्रात गेल्या ५ वर्षांमध्ये कसा कारभार सुरु आहे, हे सांगण्यासाठी ही यात्रा आहेच पण त्याशिवाय पुढच्या ५ वर्षातला महाराष्ट्र कसा असेल, हे देखील या यात्रेच्या माध्यामातून सांगितले जाईल, असा विश्वास त्यांनी सभेतून दिला.
विधानसभेते विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. आदित्य ठाकरे आणि फडणवीस यांचा शेतीशी काही ओक संबंध नसताना पिकविम्यासाठी सरकारने आणि शिवसेनेने मोर्चा काढत. सरकारमध्ये असूनही सेना हा रडीचा डाव का खेळत आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राज्यातील जनता पुरात वाहून जात असताना मुख्यमंत्री मात्र महाजनादेश यात्रेतून निवडणूकीचा प्रचार करतात. त्यामुळे पुरात अडकलेली जनता महत्त्वाचा की निवडणुकाचा प्रचार महत्त्वाचा? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ट नेते छगन भुजबळ यांनी देखील सरकारवर टिकास्त्र सोडले. सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. मात्र अजूनही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. फक्त योजनेला नाव दिले छत्रपती सन्मान कर्जमाफी योजना. छत्रपती शिवाजी महाराज जर आज असते सरकारमधील लोकांना कडेलोट केले असते, असे त्यांनी सांगितले. तसेच सीसीडीचे प्रमुख सिद्धार्थ यांनी आत्महत्या करण्यामागे आयकर विभागाने त्यांची केलेली पिळवणूक हे खरे करण असल्याचे ही ते म्हणाले