नवी दिल्ली – सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलकांना अटक करून ठेवण्यासाठी दिल्लीत उभारण्यात आलेल्या विविध स्टेडियमचा वापर तात्पुरत्या कारागृहाच्या स्वरूपात करण्याचा मोदी सरकारचा इरादा होता. त्यासाठी त्यांनी दिल्ली सरकारकडे अनुमतीही मागितली होती.
पण आम्ही ती अनुमती न दिल्याने केंद्र सरकार आमच्यावर संतप्त आहे असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या विधानांवरही त्यांनी टीका केली आहे. कॅ अमरिंदरसिंग हे भाजपचीच भाषा बोलत आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
दिल्ली पोलिसांनी दिल्लीच्या स्टेडियमचा वापर तात्पुरत्या स्वरूपातील कारागृहात करण्याची अनुमती राज्य सरकारकडे मागितली होती पण गेल्याच आठवड्यात दिल्ली सरकारने ती नाकारली होती. आम्ही हे केल्यामुळेच केंद्र सरकार आमच्यावर रागावले आहे असे ते म्हणाले.
ज्या तीन कायद्यांना शेतकऱ्यांना विरोध आहे तेच तीन कायदे आम आदमी पक्षाच्या सरकारनेहीं मान्य केले आहेत आणि तशी अधिसूचना त्यांनी जारी केली आहे आता ते शेतकऱ्यांसाठी खोटी सहानुभुती दाखवत आहेत अशी टिका पंजाबचे मुख्यमंत्री कॅ अमरिंदर सिंग यांनी केजरवाल यांच्यावर केली आहे.
त्या संबंधात बोलताना केजरीवाल म्हणाले की या कायद्यांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी आहे आणि संपुर्ण देशभर ते लागू आहेत. तथापि त्यापैकी एकाच कायद्याची अधिसूचना आम्ही काढली आहे असे स्पष्टीकरण केजरीवालांनी दिले. केंद्राने शेतकऱ्यांची किमान आधार भूत किंमतीची मागणी त्वरीत पुर्ण करावी अशी मागणीही केजरीवालांनी यावेळी केली.