कुस्तीगीर, अभिनेते, निर्माते व राज्यसभा सदस्य दारासिंग यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात पंजाबातील अमृतसरजवळील धर्मचक नावाच्या खेड्यात 19 नोव्हेंबर 1928 रोजी झाला. वयाच्या सतराव्या वर्षांपर्यंत त्यांनी शेतातच काम केले. शरीरयष्टी बलदंड असल्याने त्यांचा कष्टाच्या कामाचा आवाका मोठा होता. त्या काळात त्यांच्या गावाच्या आजूबाजूच्या परिसरातील तरुण मुले नशीब अजमावण्यासाठी सिंगापूरला जात. दारासिंग यांचे चुलतेही तेथे राहत होते. दारासिंगही त्यांच्याकडे राहू लागले. एका लष्करी मद्यालयात त्यांना रात्रीच्या पहारेकऱ्याची नोकरी मिळाली.
त्यांची कुस्तीची आवड व दणकट शरीरयष्टी पाहून एकाने त्यांना “कुस्त्या का खेळत नाहीस?’ म्हणून विचारले. आता इतक्या मोठ्या वयात कुस्ती शिकायची कशी काय व त्यासाठी लागणारा खुराकाचा खर्च कसा परवडायचा हा प्रश्न होताच. पण त्यांना एक चांगले वस्ताद भेटले. त्यांनी सांगितले, वयाच्या पंचविशीपर्यंत हाडे तयार होत असतात, कुस्ती सहज शिकता येईल. त्यांची तालीम सुरू झाली व वयाच्या एकोणिसाव्या वर्षीच दारासिंग कुस्तीच्या आखाड्यात उतरले.
कुस्तीचे प्राथमिक धडे घेतल्यावर दारासिंग सिंगापूरमधील भारतीय कुस्तीगीरांच्या गटाचे सभासद झाले. त्यांनी त्यांच्या पहिल्या जाहीर कुस्तीत एका चिनी मल्लाला हरविले. या कुस्तीने त्यांना कुस्तीगीर म्हणून प्रसिद्धी आणि आर्थिक प्राप्तीही झाली. अशाच आणखी एकदोन कुस्त्या जिंकल्यावर त्यांनी पहारेकऱ्याची नोकरी सोडून दिली आणि कुस्तीवर संपूर्ण लक्ष केंद्रित केले. सिंगापुरात त्यांनी कुस्तीमधे चांगले नाव कमावले. त्यानंतर दारासिंग यांनी इंडोनेशिया आणि श्रीलंका येथे दौरा केला. तिथल्या पहिलवानांना हरवून भारतात आले. त्या वेळी मुंबईत प्रसिद्ध युरोपीय कुस्तीगीर किंगकॉंगचा मोठा बोलबाला होता.
किंगकॉंग ताकदीसाठी आणि उद्दामपणासाठी कुप्रसिद्ध होता. दारासिंगांनी मात्र मुंबईत त्याच्याशी जबरदस्त कुस्ती खेळून त्याला धूळ चारली. मात्र हा पराभव किंगकॉंगला जिव्हारी लागला आणि तो सिंगापूरला निघून गेला. त्यानंतर दारासिंग यांनी युरोपदौरा केला आणि भरपूर कुस्त्या खेळले. वर्ष 1959 मध्ये कॅनडाला जाऊन तिथे कुस्त्या मारून दारासिंग यांनी राष्ट्रकुल ट्रॉफी जिंकली आणि ते भारतात परत आले.
वर्ष 1960 मध्ये सभरवाल आणि रामकुमार नावाचे दोन चित्रपटनिर्माते भेटले आणि त्यांनी चित्रपटात भूमिका करावी असा प्रस्ताव दारासिंगांसमोर ठेवला. दारासिंगाच्या प्रसिद्धीचा फायदा करून घेण्याचा निर्मात्यांचा हेतू स्पष्ट होता. पण दारासिंग बधले नाहीत. कारण त्यांची कुस्तीची कारकीर्द संपून जाईल, अशी त्यांना भीती वाटत होती. तसेच त्यांना चित्रपटांचे बिलकुल आकर्षणही नव्हते.
महेश भट यांचे वडील नानाभाई भट यांची गाठ पडली व दारासिंग यांनी किंगकॉंग या चित्रपटात काम केले. त्यावेळी कौटुंबिक व सामाजिक रडक्या चित्रपटांचा वैताग आलेल्या प्रेक्षकांनी किंगकॉंग डोक्यावर घेतला आणि दारासिंग यांचा नवीन पडद्यावरचा आखाडा सुरू झाला. त्यानंतर त्यांनी सुमारे 125पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या तसेच 6 चित्रपटांचे दिग्दर्शन केले. दोन चित्रपटांची निर्मितीसुद्धा केली. दूरदर्शनवरील रामायणातील त्यांची हनुमानाची भूमिका विशेष गाजली. 12 जुलै 2012 राजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले.