पाटणा – केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि भाजपचे नेते नित्यानंद राय यांच्या एका वक्तव्यामुळे बिहारमध्ये राजकीय वादंग निर्माण झाले आहे. विरोधकांना सत्ता मिळाल्यास बिहार दहशतवाद्यांचे नंदनवन बनेल, अशा आशयाचे वक्तव्य राय यांनी केले. त्यामुळे संतप्त झालेल्या कॉंग्रेस आणि राजदकडून जोरदार पलटवार करण्यात आला.
बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचारामुळे राजकीय वातावरण तापले आहे. अशातच राय यांनी एका प्रचारसभेत केलेले भाषण वादाला तोंड फोडणारे ठरले आहे. केंद्र सरकार काश्मीरमधून दहशतवाद्यांचा सफाया करत आहे. मात्र, विरोधकांची महाआघाडी विजयी झाल्यास ते दहशतवादी बिहारमध्ये आश्रय घेतील.
सत्ता मिळवण्यासाठी विरोधक दहशतवादी आणि पाकिस्तानशीही समझोता करू शकतात, असे राय यांनी म्हटले. त्या भाषणाचा व्हिडीओ प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय वातावरण आणखीच ढवळून निघाले. विरोधकांच्या महाआघाडीचे घटक असणाऱ्या कॉंग्रेस आणि राजदने राय यांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला.
निवडणुकीत समोर कठीण आव्हान निर्माण झाल्यावर प्रचारात पाकिस्तान आणि काश्मीरला खेचण्याची भाजपला सवयच आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसकडून देण्यात आली. बिहारमधील जेडीयू-भाजपचा समावेश असणाऱ्या सत्तारूढ एनडीएने 15 वर्षांच्या राजवटीत बेरोजगारी, गरिबी आणि उपासमारी निर्माण केली.
एनडीएच्या गैरकारभारापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप धडपड करत आहे, अशी खिल्ली राजदकडून उडवण्यात आली.