नवी दिल्ली – तुर्की आणि सिरियामध्ये भूकंपात जीवितहानीसोबतच मोठी वित्तहानी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेमुळे जगभरातून दु:ख व्यक्त केले जात आहे. दरम्यान, भारत सरकार टर्की देशाची मदत करण्यासाठी रेस्क्यू टीम पाठवणार आहे. तसेच भूकंपग्रस्त लोकांच्या मदतीसाठी वैद्यकीय पथक, तसेच अन्य सामान पाठवले जाणार आहे. 1300हून अधिक लोक या दुर्घटनेत मृत्यू मुखी पडल्याची माहिती समोर येत आहे.
तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच भारताकडून शक्य ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधानांचे मुख्य सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर तुर्कीमधील भूकंपग्रस्त भागाला मदत करण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे.
भारत सरकारकडून तुर्कीमध्ये एनडीआरएफची दोन पथके पाठविले जाणार आहेत. या दोन पथकांमध्ये एकूण 1000 कर्मचारी असणार आहेत. तसेच उत्तम प्रशिक्षण दिलेले श्वानपथकाचाही समावेश आहे. या बचावपथकासोबत आवश्यक ती सर्व उपकरणं दिली जातील. बचावपथकाकडून भूकंपग्रस्त भागात शोधमोहीम राबवली जाणार आहे.
याशिवाय अत्यावश्यक औषधांसह प्रशिक्षित डॉक्टर आणि पॅरामेडिक्ससह वैद्यकीय पथकेदेखील सज्ज आहेत. तसेच जखमी लोकांवर उपचार करणारी एक डॉक्टरांची टीमदेखील पाठवली जाणार आहे. या टीममध्ये प्रशिक्षित डॉक्टर्स असतील, अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, तुर्की सरकार आणि अंकारा येथील भारतीय दूतावास आणि इस्तंबूलमधील वाणिज्य दूतावास कार्यालय यांच्या समन्वयाने मदत सामग्री पाठवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.