ढाका – बांगलादेशात काही अत्रात समाजकंटकांनी 14 मंदिरांची तोडफोड केली आहे. शनिवारी रात्री समाजकंटकांनी ठरवून या मंदिरांना लक्ष्य केले आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे. अंधाराचा फायदा घेऊन समाजकंटकांनी या 14 मंदिरांची तोडफोड केल्याचे ठाकूरगांव गावातील बलियादांगी उपजिल्ह्यातील हिंदू समाजाचे नेते बिद्यानाथ बर्मन यांनी सांगितले. बर्मन हे उपजिल्ह्यातील पूजा सेलिब्रेशन कौन्सिलचे सरचिटणीस आहेत.
तोडफोड झालेल्या मंदिरांमधील काही मूर्त्यांची तोडफोड करण्यात आली आहे. तर काही मंदिरातील मूर्त्या मंदिराशेजारच्या तलावांमध्ये फेकून दिल्या गेल्या होत्या, असेही बर्मन यांनी सांगितले. हे कृत्य कोणी केले असावे, हे समजायला काही मार्ग नाही. मात्र तपास करून या गुन्हेगारांना योग्य शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी बर्मन यांनी केली आहे.
बांगलादेशात नेहमीच धार्मिक सौहार्दाचे वातावरण राहिले आहे. यापूर्वी कधीही अशप्रकारचे घृणास्पद कृत्य घडलेले नाही, असे हिंदू समाजाचे नेते आणि हिंदू परिषदेचे अध्यक्ष समर चॅटर्जी यांनी सांगितले. माले. धार्मिक अल्पसंख्य हिंदू समाजाचे बहुसंख्य मुस्लिम समाजाबरोबर कधीही कोणत्याही मुद्यावरून तंटा झालेला नाही. त्यामुळे हे कृत्य कोणी केले असावे, हे समजायला मार्ग नाही, असेही ते म्हणाले.
शांतता बिघडवण्यासाठी नियोजनबद्ध कारस्थान
मंदिरांच्या तोडफोडीचा उद्योग शनिवारी मध्यरात्र ते रविवारी पहाटेच्या दरम्यान झाला असावा, असा अंदाज बलियादांगी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी खैरुल अनाम यांनी व्यक्त केला. देशातील शांतता आणि सौहार्दाचे वातावरण बिघडवण्यासाठी केलेले हे नियोजनबद्ध कारस्थान आहे, हे स्पष्ट आहे. असे ठाकूरगावचे पोलीस प्रमुख जहांगीर हुसैन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या सर्व प्रकरणाच्या तपासाला लगेचच सुरुवात करण्यात आली असून या समाजकंटकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे.