मुंबई : महाराष्ट्र एटीएस आणि एनआयने अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून देशाच्या स्वातंत्र्य दिनाला घातपात घडवण्याचा प्रयत्न असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या दहशवाद्यांची महाराष्ट्र एटीएसने कसून चौकशी केली असता त्यांचा इसिस या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. एवढच नाही तर येत्या 15 ऑगस्टला देशात दहशतवाद्या कारवायांचा मोठा प्लॅन असल्याचे उघड झाले आहे. या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर भारतासह इस्रायलही असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र एटीएसने अटक केलेल्या दहशतवाद्यांची मोहम्मद युनूस साकी, मोहम्मद इम्रान युनूस खान, झुल्फिकार बरोडावाला, शाहनवाज आलम अशी नावे आहेत. नुकतेच अटक करण्यात आलेल्या झुल्फिकार अली बरोडावाला याने ठाणे जिल्ह्यातील पडघा येथे फ्लॅट भाड्याने घेतला होता का, याचा तपास आता महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक करत आहे. त्यांच्या टार्गेटनुसार मुंबईतील प्रमुख ठिकाणांवर लक्ष ठेवण्यासाठी हा फ्लॅट भाड्याने घेतला होता का याचा तपास करत आहेत. एटीएसने अलीकडेच झुल्फिकार अली बडोदावाला याला ताब्यात घेतले होते, ज्याला एनआयएने इसिस मॉड्यूलशी कथित संबंध असल्याच्या कारणावरून गेल्या महिन्यात अटक केली होती.
इसिस आणि अल सुफा सारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित राज्यभरातून पाच जणांना अटक केली आहे. कोल्हापूर, रत्नागिरी आणि पुणे येथून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर आणि पुण्याजवळ दहशतवाद्यांनी ट्रेनिंग केले. निपाणी, संकेश्वरमध्ये मुक्काम केला. आंबोलीमध्ये बॉम्बचं प्रशिक्षण सुरु असल्याचे समोर आले होते.
अल-सुफा ही दहशतवादी संघटना मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यात स्थापन झाली होती. राजस्थानच्या तरुणांना कट्टरपंथी बनवण्यासाठी इंटरनेटचा वापर करत असल्याचे आढळून आले. या संघटनेचे मुख्य लक्ष्य आरएसएसचे सदस्य आणि भाजप नेते असल्याचं तपासात समोर आलंय. एक दशकापूर्वी अल सुफा संघटना प्रकाशात आल्यानंतर सरकारने बंदी घातली होती.
मध्यप्रदेशातून येऊन पुण्यात तळ ठोकून कोकणात प्रशिक्षण घेऊन 15 ऑगस्टला घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे गुप्तचर यंत्रणांनी मुंबई, दिल्लीसह देशातील महत्त्वाच्या शहरांना सावधानतेचा इशारा दिला आहे. भारतात मोठा विध्वंसक हल्ला घडवण्यासाठी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्यावरून हाय अलर्ट देण्यात आला आहे.