भोर (प्रतिनिधी) – भोर तालुक्यात बुधवारी (दि. 3) झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका महावितरणला बसला आहे. गुरुवारी (दि. 4) दुपारी 2 वाजेपर्यंत 111 गावांतील 25 हजार वीजग्राहकांचा विजपुरवठा सुरळीत झाला आहे. तर अद्याप 37गावातील, 3500 ग्राहकांचा विदयुत पुरवठा खंडित असून तो सुरळीत करण्यासाठी महावितरणकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे.
भोर उपविभागा अंतर्गत असलेले एकूण 14 उच्च दाब वाहिन्या, 768 रोहित्रे नादुरुस्त झाल्यामुळे तालुक्यातील 152 गांवांतील 28600 ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. गुरुवारी (दि. 4) दुपारी 2 वाजेपर्यंत 111 गावांच्या 13 उच्चदाब वाहिन्या, 623 रोहित्रे कार्यान्वित झाल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. तर उच्चदाब वाहिनीचे 12 खांब व लघुदाब वाहिनीचे 28 खांब वादळामुळे उन्मळून पडल्यामुळे अद्याप 37 गावांतील 3500 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित आहे.
तसेच ज्याप्रमाणे विद्युत खांब उभे राहत जातील त्याप्रमाणे विद्युतपुरवठा सुरळीत केला जाणार आहे, अशी माहिती भोरचे उपकार्यकारी अभियंता संतोष चव्हाण यांनी दिली.
दरम्यान, तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सासवडचे कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे गुरुवारी भोरमध्ये उपस्थित राहून खबरदारी घेत आहेत.