Uttar Pradesh । उत्तरप्रदेशच्या कासगंजमध्ये मोठी दुर्घटना घडली. भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली तलावात उलटून सात मुलांसह २० जणांचा मृत्यू झाला असून ही संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा ट्रॅक्टर नियंत्रणाबाहेर जाऊन तलावात पडला. स्थानिक लोकांनी प्रशासनाच्या मदतीने शोध सुरू केलाय. सुमारे तीन तास शोध घेतल्यानंतरही तिघांचा शोध लागला नाही. गोताखोर तलावात शोध घेत आहेत. जखमींना कासगंज जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जैथरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागला कासा गावातील सुमारे ४५ लोक शनिवारी सकाळी ट्रॅक्टर ट्रॉलीतून गंगेत स्नान करण्यासाठी गेले होते. 9.30 च्या सुमारास ट्रॅक्टर गावातून निघाला होता. रात्री साडेदहाच्या सुमारास पटियाली परिसरातील दरियावगंज गावाबाहेर पोलीस ठाण्याजवळ पोहोचले.
यावेळी भरधाव वेगाने जाणारा ट्रॅक्टर कल्व्हर्टवर नियंत्रणाबाहेर गेला. ट्रॅक्टर थेट तलावात पडला. ट्रॉलीतून प्रवास करणाऱ्या लोकांचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक तेथे पोहोचले. गावातील लोक मदत करू लागले. ट्रॉलीतून प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त होती आणि तलावाची खोली जास्त असल्याने गावातील लोकांना फारशी मदत करता आली नाही.
काही लोकांनाच पाण्यातून बाहेर काढता आले. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी जमा झाले. कासगंजचे डीएम आणि एसपी घटनास्थळी पोहोचले आणि 20 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली. तर 15 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सात मुलांचाही समावेश आहे.या अपघातामुळे एटा आणि कासगंज जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा
Sharad Pawar । राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका,’तुतारी चिन्ह मिळालं मग फुंका…’