359 मशालींनी उजळणार किल्ले प्रतापगड
मेढा – सातारा जिल्ह्यातील देदीप्यमान इतिहास असलेला प्रमुख गड म्हणजे किल्ले प्रतापगड. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच गडावर श्री भवानी मातेची स्थापना केली होती. तेव्हापासून या गडावर नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. उद्यापासून सुरू होणाऱ्या या उत्सवाचे 359 वे वर्ष असून गडावर 359 मशाली (दिवे) लावून प्रतापगड उजळणार आहे. अष्टभुजा महिषासूरमर्दिनी श्री भवानी माता देवी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत.
धावपळीच्या राजकारणात तुळजापूर येथे दर्शनास जाण्यास सवड मिळेना म्हणून नेपाळमधील गंडकी नदीतून आणलेल्या शाळीग्रामाची मूर्ती बनवून घेतली. तिची मंत्र जागराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ते प्रतापगडावर प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून आजपर्यंत सुमारे 358 वर्षे किल्ले प्रतापगडावर नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. घटस्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गडावर दीपोत्सव पार पडणार आहे. हा दीपोत्सव पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक, पर्यटक येत असतात. यंदा या नवरात्रोत्सवाचे 359 वे वर्ष असल्याने 359 मशालीनी गड उजळून निघणार आहे. यानंतर पंचमीला देवीची पालखीतून मिरवणूक तर तर अष्टमीला घागर फुंकण्याचा कार्यक्रम रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत पार पडणार आहे.
नवमीला छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13 वे वंशज माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते देवीची पूजा तर दशमीला दसऱ्या दिवशी देवीची पालखीतून मंदिरापासून पायथ्यापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. तिथून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापर्यंत जाऊन नवरात्रोत्सवाचा समारोप होतो. या उत्सवास राजमाता कल्पनाराजे भोसले, श्री. छ. उदयनराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती असते. प्रतापगडावरील भवानी माता उत्साहाचे यंदाचे 359 वे वर्ष असून याही वर्षी प्रशासनाच्या सहकार्याने हा उत्सव पार पडणार आहे. श्री. छ. उदयनराजे भोसले व राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या देखरेखेखाली उत्सव हा पार पडणार आहे.
– श्रीकांत फडणीस, व्यवस्थापक, भवानी माता संस्थान प्रतापगड