चिपळूण – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना इतर राजकीय नेत्यांची मिमिकरी करताना आपण अनेकदा पाहिलं. मात्र आता शिवसेनेच्या एका नेत्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिकरी करत त्यांच्यावर निशाणा साधला. माजीमंत्री भास्करराव जाधव यांनी मोदींची हुबेहुब मिमिकरी करत महागाईवरून टीका केली.
नरेंद्र मोदी 2014 साली सत्तेत येण्यापूर्वी मागील 60 वर्षांमध्ये काँग्रेसने काय केले, असा प्रश्न विचारत होते. सामान्य नागरिकही, काँग्रेसने काहीच केले नाही, असे सांगत त्यांना प्रतिसाद देत होते. मात्र, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या दोन कार्यकाळामध्ये काहीच केले नाही, हे लोकांच्या आता लक्षात येत असल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलं.
काँग्रेसने आजपर्यंत काहीच केले नाही, असं मोदी म्हणायचे. काँग्रेसने जे करुन ठेवलंय ते विकायचं काम बंद कर राजा, असा टोला जाधव यांनी लावला. तसेच तुम्ही काहीतरी करा, अस नागरिक नरेंद्र मोदींना सांगत असल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले.
यावेळी जाधव यांनी वाढती महागाई, गॅस सिलेंडरचे वाढलेले दर आणि उज्ज्वला योजना कशी फसवणूक कराणारी होती, यावर भाष्य केलं. मोदी सरकारने जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप जाधव यांनी केला.