पुणे – राज्यातील शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी या योजनेवर भरारी पथके व दक्षता पथके “वॉच’ ठेवणार आहेत. या पथकामार्फत आता शाळांची अचानक तपासणी करून गैरव्यवहार आढळल्यास संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.
नवीन शैक्षणिक वर्षाला जून पासून सुरूवात झाली असून शाळांमधून विद्यार्थ्यांना आहार उपलब्ध करून देण्यात येत आहे. शाळांमधून विद्यार्थ्यांना आहाराचे वाटप कमी करणे, निकृष्ट प्रतीचा आहार मुलांना देणे, आहाराचे वाटप न करणे, योजनेमध्ये गैरव्यवहार करणे आदी स्वरुपाच्या तक्रारी शासनाकडे येतात. याची दखल घेऊन विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचा आहार मिळणे आवश्यक आहे.
त्यादृष्टीने जिल्हा, तालुका स्तरावर भरारी पथके आणि दक्षता पथकांची स्थापना करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, मुंबईच्या शिक्षण उपसंचालकांना दिले आहेत. विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ उत्तम प्रकारे मिळावा यासाठी संबंधित यंत्रणानी नियमित तपासण्या करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
“…मग 25 वर्षे गप्प का बसलात”; केदार दिघे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना सवाल
तीन दिवसांत द्यावा लागणार अहवाल…
जिल्हास्तरावर भरारी पथक कार्यान्वित करण्यासाठी जिल्हा परिषदेतील अधिकारी व दोन कर्मचारी यांची भरारी पथकामध्ये नियुक्ती करावी लागणार आहे. भरारी पथकास तपासणी करताना आढळून आलेल्या बाबी तीन दिवसांच्या आत अहवाल सादर करून मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास बाबी आणून द्याव्या लागणार आहेत. योजनेच्या अंमलबजावणीमध्ये त्रूटी आढळून आल्यास त्यात सुधारणा कराव्या लागणार आहेत.
Friendship Day: इतिहास आणि महत्त्व जाणून घेऊन असा साजरा करा आजचा ‘आंतरराष्ट्रीय मैत्री दिन’
या बाबींची तपासणी होणार
- तांदूळ व धान्यादी माल प्रत्यक्ष व शिल्लक साठा
- आहाराची गुणवत्ता
- पिण्याची पाण्याची उपलब्ध सुविधा
- विद्यार्थ्यांसाठीची हात धुण्याची व्यवस्था
- विद्यार्थ्यांची पटसंख्या व उपस्थिती
- आहाराबाबत विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
- पोषण आहार योजनेच्या दैनंदिन नोंदी
- विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
- प्रत्यक्ष स्वयंपाकी व मदतनीसांची संख्या
- अन्न शिजविण्याची यंत्रणा