नवी दिल्ली – गुजराथी-राजस्थानी नागरिक जर महाराष्ट्रातून गेले तर राज्यातील सगळा पैसा चालला जाईल आणि मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही अशा आशयाची टिप्पणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. अपेक्षेप्रमाणे मोठा वाद झाला. विरोधी पक्ष त्यांच्यावर तुटून पडलेच पण कोश्यारींचे समर्थन करण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातही राहीली नाही. त्यांनीही असहमती दर्शवल्यावर आणि कदाचित दिल्लीसह सगळीकडून दबाव वाढल्यानंतर कोश्यारी यांनी अखेर काल माफी मागितली.
यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज- समर्थ रामदास स्वामी, सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्याबाबतही कोश्यारींनी वादग्रस्त विधाने केली आहेत. मध्यंतरी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सेक्युलर झालेत का, असा सवालही त्यांनी जाहीरपणे विचारला होता. तेव्हाही वाद झाला होता. कोश्यारींकडून आपल्याला हिंदुत्वाच्या प्रशस्तीपत्रकाची गरज नाही असे ठाकरे त्यावेळी म्हणाले होते. एकंदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेले भगतसिंह कोश्यारी उर्फ भगतदा महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून आल्यापासून सातत्याने वादात राहीले आहेत. हे त्यांच्या वक्तव्यांचे झाले. राज्यपाल म्हणून त्यांनी घेतलेले अथवा न घेतलेले काही निर्णयही त्यांना टीकेच्या केंद्रस्थानी ठेवून गेले.
मात्र कोश्यारी यांची वादग्रस्त विधानांची माळ फार मोठी आहे. ती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादीत नाही. ज्या उत्तराखंडचे मुख्यमंत्री पद त्यांनी भूषवले होते व नंतर विरोधी पक्षनेते पद भूषवले त्या उत्तराखंडमध्येही त्यांनी अशी वादग्रस्त विधाने केली होती. महाराष्ट्रात ते तुलनेने बरे बोलले असे म्हणण्याची वेळ यावी अशी विधाने त्यांनी तिकडे केली होती. त्यामुळे अडचणीतही आले होते.
उत्तराखंडचे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री हरिष रावत यांच्यावरही त्यांनी धक्कादायक टीका केली होती व त्यांना एकलवा वानर असे म्हटले होते. 2019 मध्ये ते म्हणाले होते प्रभू रामांच्या सेनेत अनेक वानर होते. मात्र इथे रावत हे एकटेच वानर आहेत. त्यांचे सगळे वानर आम्हाला येऊन मिळाले आहेत. त्यांनी कॉंग्रेसमधील चांगली माणसे बाहेर घालवली. त्यामुळे त्यांचे जहाज आता फार काळ तगणार नाही.
विजय बहुगुणांनाही प्रसाद
कॉंग्रेसचे अन्य नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांच्यासंदर्भातही कोश्यारींनी वादग्रस्त टीप्पणी केली होती. डेहराडून येथील कार्यक्रमात बोलताना ते एकदा म्हणाले होते की विजय बहुगुणा हे उत्तर प्रदेशचे दिवगंत मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा यांचे पुत्र आहेत की नाही हे सिध्द करण्याची त्यांनी टेस्ट करून घ्यावी अशी धक्कादायक टिप्पणी त्यांनी केली होती. हेमवती नंदन बहुगुणा हे फार मोठे नेते होते व त्यांचे नाव आजही दोन्ही राज्यांत आदराने घेतले जाते. विजय आणि त्यांच्या भगिनी रिटा जोशी बहुगुणा यांनीही मोठ्या पदांवर काम केले आहे. कॉंग्रेस ते भाजप असा त्यांचा प्रवास राहीला आहे. त्यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केल्यामुळेही कोश्यारी वादात सापडले होते.
आता महाराष्ट्रात त्यांनी माफी मागितली आहे. मात्र त्यांच्या बेताल वक्तव्याने रोखणे आवश्यक आहे. अन्यथा ते राज्यातील भाजपला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या परत पाठवणीसाठी देवेंद्र फडणवीसच पुढाकार घेतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे.