नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी तुर्की आणि सीरियामध्ये आलेल्या भूकंपाने दोन्ही देश पूर्णपणे उद्धवस्त झाले आहेत. या देशांमध्ये झालेल्या भूकंपात हजारो निष्पाप लोकांचा बळी गेला आहे, तर लाखो जण जखमी झाले आहेत. जगात हे सर्व सुरु असताना आता भारतातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्थेने ( एनजीआरआय ) मोठा इशारा दिला आहे. उत्तराखंडमध्ये कधीही भूकंप होण्याची शक्यता एनजीआरआय संस्थेने व्यक्त केली आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
एनजीआरआय संस्थेतील मुख्य शास्त्रज्ञ डॉ. एन. पूर्णचंद्र राव यांनी याविषयीची माहिती दिली आहे. एन. पूर्णचंद्र राव यांनी “पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली विविध स्तर असतात, ज्यांची सतत हालचाल होत असते. भारतातील पृष्ठभागाखालील स्तर प्रतिवर्षी ५ सेटींमीटरने सरकत आहे. याने दबाव निर्माण होत असून, मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.”
Hyderabad| Earth’s surface comprises various plates that are constantly in motion. The Indian plate is moving about 5 cm per year, leading to accumulation of stress along the Himalayas increasing the possibility of a greater earthquake: Dr N Purnachandra Rao, Chief Scientist,NGRI pic.twitter.com/YCwCInLcm8
— ANI (@ANI) February 21, 2023
“हिमाचल, उत्तराखंडसह नेपाळच्या पश्चिम भागात कधीही भूकंप होऊ शकतो. त्यापार्श्वभूमीवर आम्ही उत्तराखंडमध्ये १८ भूकंप केंद्रे स्थापन केली आहे,” अशी माहिती एन. पूर्णचंद्र राव यांनी दिली आहे.
दरम्यान, ही माहिती अशावेळी समोर आली आहे, जेव्हा उत्तराखंडमधील हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या जोशीमठ येथील घरं, दुकानं, हॉटेलांना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे हजारो लोकांना आपली घरं सोडून विस्थापित व्हावं लागलं आहे. विशेष म्हणजे १९७६ पासूनच या भागात अशाप्रकारच्या घटनाक्रमांचे इशारे देण्यात आले होते.