इयान चॅपेल यांनी केली स्तुती; स्टिव्ह स्मिथपेक्षा धावांची भूक जास्त
मेलबर्न – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हाच क्रिकेटच्या तिनही प्रकारात सर्वोत्तम क्रिकेटपटू आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटी क्रिकेटपटू व समालोचक इयान चॅपेल यांनी व्यक्त केले आहे.
भारताचा कर्णधार कोहली व ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांची तुलना करताना चॅपेल यांनी कोहलीला झुकते माप दिले. आधुनिक क्रिकेटच्या या कालखंडात जेव्हा मी कोहली व स्मिथ यांची कामगिरी पाहतो तेव्हा कोहलीच श्रेष्ठ वाटतो. टी-20, एकदिवसीय आणि कसोटी या क्रिकेटच्या तिनही प्रकारात सातत्याने धावा करत कोहलीने जागतिक क्रिकेटवर आपला दबदबा निर्माण केला आहे. सामना कोणताही असो, खेळपट्टी कशीही असो, समोर प्रतिस्पर्धी गोलंदाज देखील कोणीही असो तसेच संघाची स्थिती काय आहे हे सर्व कोहलीच्या डोक्यात असते व त्यानुसार तो आपली खेळी साकार करतो. हे कसब स्मिथकडे सातत्याने कधीच दिसले नाही. प्रथम फलंदाजी करुन भारताने जितके सामने जिंकले आहेत त्यापेक्षाही जास्त सामने धावांचा पाठलाग करताना जिंकले आहेत. तसेच या सामन्यांत कोहलीनेच सरस कामगिरी केल्याचे दिसून येते. त्याला स्वतःला धावांचा पाठलाग करताना फलंदाजी करायला आवडते, असेही निरीक्षण चॅपेल यांनी नोंदवले.
जसे पूर्वीच्या कालखंडात विविध देशांच्या खेळाडूंमध्येच नाही तर वेगवेगळ्या काळात खेळत असलेल्या खेळाडूंची देखील अनेकदा तुलना झालेली आहे. दोन भिन्न काळात खेळलेल्या खेळाडूंमध्ये तुलना करणे योग्य नाही. मात्र, सध्याच्या क्रिकेटमध्ये कोहली व स्मिथ हेच दोन सर्वाधिक
चर्चेत असलेले फलंदाज आहेत. त्यामुळे त्यांच्यात तुलना होणे स्वाभावीक आहे. कोहलीप्रमाणे स्मिथही चांगला फलंदाज आहे. मात्र, फिरकी गोलंदाजीवर त्याच्या धावा काढण्याचा वेग मंदावतो, तसेच तो अशा गोलंदाजाविरुद्ध फारसा धोका पत्करत नाही. उलट कोहली फिरकी तसेच वेगवान गोलंदाजीवर देखील आपली हुकुमत सिद्ध करतो हाच मुख्य फरक या दोन खेळाडूंमध्ये आहे, असेही चॅपेल म्हणाले.
भारताविरुद्धची मालिका महत्त्वाची….
करोनामुळे जगभरात क्रीडाक्षेत्राला प्रचंड तोटा सहन करावा लागला आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी टी-20 विश्वकरंडक स्पर्धाच नाही तर भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका देखील व्हायलाच पाहिजे. गेल्या मालिकेत भारतीय संघाने इतिहास घडवताना यजमान ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करत मालिका जिंकली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत चेंडूची छेडखानी केल्याचे सिद्ध झाल्यानंतर सलामीवीर डेव्हिड वॉर्नर व स्मिथ यांच्यावर एक वर्षाची बंदी लावली गेली होती. त्यामुळे ती मालिका जिंकणे भारतीय संघाला लाभदायक ठरले होते. यावेळी मात्र जर भारतीय संघाला मालिका जिंकायची असेल तर वॉर्नर व स्मिथ यांना लवकरात लवकर बाद करावे लागेल अन्यथा तेच भारताच्या हातातून मालिका हिसकावून घेतील. राहिला प्रश्न भारताविरुद्धच्या मालिकेचा तर ही मालिका व्हायलाच पाहिजे, तरच भारत व ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळ झालेले नुकसान भरून काढू शकेल, असेही चॅपेल यांनी सांगितले.