मायणी – येरळवाडी, ता. खटाव येथील मध्यम प्रकल्प पूर्ण भरला असून या धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रात वाहून जाणारे रब्बी पिकांसाठी लाभदायी आहे. त्यामुळे हे पाणी शेतीसाठी सोडावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
गेल्या काही दिवसांत तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने येरळवाडी मध्यम प्रकल्प पूर्ण भरला असून सांडव्यावरून पाणी नदीपात्रात वाहून जात आहे. हे पाणी कोरडवाहू शेतीसाठी सोडावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. हे पाणी शेतीसाठी पाटातून सोडल्यास पाटाच्या कडेला असलेल्या शेतीला लाभ होऊ शकतो. बहुतांशी शेतकऱ्यांनी विहिरी किंवा बोरवेल खोदलेल्या नाहीत. हे शेतकरी पाटाला येणाऱ्या पाण्यावर खरीप व रब्बी हंगामात पिके घेतात.
प्रकल्पाच्या पूर्व, पश्चिम व दक्षिणेस असलेल्या अंबवडे, मरडवाक, गोरेगाव, मोराळे, गुंडेवाडी, चितळी या गावांसाठी पाटातून पाणी सोडल्यास त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर भूजल पातळीही वाढेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे .आम्ही कित्येक वर्षांपासून खरीप हंगाम पावसावर घेत असतो. रब्बी हंगामात येरळवाडी प्रकल्पातील पाणी वापरतो. सध्या पावसाने उघडीप दिली आहे. जमिनीतील ओलावा कमी होण्याआधीच या प्रकल्पाचे पाणी पाटाला सोडल्यास रब्बी हंगामातील पिकांना फायदा होईल असे गुंडेवाडी येथील शेतकरी रामभाऊ देशमुख यांनी सांगितले.
वाया जाणारे पाणी थेट कर्नाटकात
गेल्या अनेक दिवसांपासून प्रकल्पाच्या दक्षिण-पूर्व बाजूस असलेल्या नदीपात्रातून लाखो लिटर पाणी वाहत आहे. नदीपात्रातील बंधारे पूर्ण भरल्याने हे पाणी सांगली जिल्ह्यातून थेट कर्नाटकात जात आहे.