दिग्विजयसिंह यांचे मोदी, शहा यांना आवाहन
सेहोर – सीएए, एनआरसी, व एनपीआरच्या विरोधात दिल्लीसह देशाच्या अनेक ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन व निदर्शने सुरू आहेत. त्यातून परिस्थिती चिघळण्याचा धोका आहे. ते टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी निदर्शकांशी चर्चा करून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी सुचना ज्येष्ठ कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी केली आहे.
सध्या सुरू झालेले आंदोलन हे नागरीकांचे उत्स्फुर्त आंदोलन आहे. ही स्थिती आता राजकारण्यांच्या हातात राहिलेली नाही. हा एक आता भावनिक विषय झाला आहे असे ते म्हणाले. ते आज येथे पत्रकारांशी बोलत होते. आधी सीएए, नंतर एनपीआर आणि त्यानंतर एनआरसी अशा क्रमाने सरकारने कार्यक्रम आखला असल्याची घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. पण अनेक ठिकाणी लोक या प्रस्तावाच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्याशी वेळीच चर्चा करून ही स्थिती सरकारने नियंत्रणात आणली पाहिजे. अन्यथा ती आणखी हाताबाहेर जाण्याचा धोका आहे असे ते म्हणाले.
या कायद्याविषयी लोकांच्या मनात ज्या शंका आहेत त्याचे निरसन सरकारनेच केले पाहिजे असे ते म्हणाले. दिल्लीत 8 फेब्रुवारीला निवडणूका होत आहेत. भाजपच्या हातात तेथे कोणताही मुद्दा नसल्याने त्यांनी देशात आग लावण्याचे काम सुरू केले आहे असा आरोपही त्यांनी केला.