बीड – बीड जिल्ह्यातील पाडळसिंगी येथील शेतकरी मारुती बजगुडे यांनी दीड कोटी रुपये खर्चन एका एकरात भलीमोठी विहीर बांधली आहे. ही विहीर 41 फूट खोल आणि दोनशे दोन फूट रुंद असून यात दहा कोटी लिटर एवढा पाणीसाठा करण्यात आला आहे. गुगल मॅपवर देखील ही विहीर स्पष्टपणे दिसत आहे. या विहीरीची राज्यभरात चर्चा होत आहे.
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत बजगुडे यांची बारा एकर शेती आहे. या भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने दरवर्षी उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी मिळत नव्हते. यावर कायमचा उपाय म्हणून त्यांनी चक्क एक एकरमध्ये विहीर करण्याचा निर्णय घेतला. बजगुडे यांचा मूळ व्यवसाय हा मंडप डेकोरेशनचा आहे. ही विहीर पूर्ण बांधण्यासाठी त्यांना नऊ महिन्याचा कालावधी लागला. या विहिरीच्या पाण्यावर त्यांनी बागायती शेती करायला सुरुवात केली आहे.
बजगुडे यांनी बांधलेली ही एवढी मोठी विहीर आता इतर शेतकऱ्यांसाठी आकर्षण ठरतेय. त्यामुळे बीड मधूनच नाही तर शेजारच्या जिल्ह्यातून देखील अनेक शेतकरी ही विहीर पाहण्यासाठी त्यांच्या शेतामध्ये गर्दी करत आहे. या विहिरीतील पाण्यावर आता कोरडवाहू असलेल्या शेतीमध्ये टरबूज पेरू आणि मोसंबीच्या बागा बहरू लागल्या आहेत. बजगुडे यांनी बांधलेली ही कदाचित राज्यातील सर्वात मोठी विहीर असावी.