मुंबई – मंत्रिमंडळ रचनेनंतर भारतीय जनता पक्षाने आता आपल्या पक्ष संघटनेतही खांदेपालट केला आहे. मुंबई महापालिकेतील निवडणुक लक्षात घेऊन मुंबई प्रदेश भाजपचे अध्यक्ष पद आशिष शेलार यांना देण्यात आले आहे तर भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांना नेमण्याची घोषणा आज करण्यात आली आहे. या दोघांनाही शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नव्हते, त्याचवेळी त्यांची पक्षातील महत्वाच्या पदांवर नियुक्ती केली जाईल असे चित्र स्पष्ट झाले होते.
विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याने त्यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपद जाणार हे निश्चीत झाले होते. पण राज्य भाजप मधील हे शक्तिशाली पद नेमके कोणाला मिळणार या विषयी उत्सुकता होती. आता या पदावर ओबीसी समाजातील बावनकुळे यांना ही संधी मिळाली आहे. तेही नागपुरचेच आहेत. उपमुख्यमंत्रीही नागपुरचेच असल्याने अन्य ठिकाणच्या नेत्याला प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळेल असे बोलले जात होते. पण बावनकुळेंच्याच गळात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडली आहे.
गडकरी आणि फडणवीस यांनी आपले वजन खर्ची करूनही बावनकुळे यांना सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची उमेदवारी मिळू शकली नव्हती. पण त्यांचे आता यानिमीत्ताने पुनर्वसन झाले आहे. आता पक्षाकडून पंकजा मुंडे यांचे कसे पुनर्वसन केले जाते हा नवीन प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यांना पक्षात महत्वाचे स्थान देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा भाजप श्रेष्टींचा विचार असावा असेही सांगितले जात आहे.
मुंबई प्रदेश भाजप अध्यक्षपदी वर्णी लागलेले आशिष शेलार हे आक्रमक नेते म्हणून गणले जातात. त्यांनी शिवसेनाला सातत्याने मोठे आव्हान दिले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी आता यानिमीत्ताने त्यांच्यावर आली आहे.