महावितरणचे दुर्लक्ष : दळणवळणावर परिणाम
राजगुरुनगर- खेड तालुक्यात 15 दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे अनेक गावांचे जनजीवन विस्कळीत झाले. या पावसामुळे पश्चिम भामागील शेतकऱ्यांच्या शेतीचे, शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तालुक्यातील सर्वच रस्ते उखडले त्यामुळे दळणवळणाचा प्रश्न उद्भवला आहे, अनेक दिवसांपासून सुमारे 15 गावे आणि अनेक वाड्यावस्त्यांचा वीजपुरवठा खंडित आहे. यात एक दिवस वीज येते तर चार दिवस बत्ती गुल असल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाला आहे. तर महावितरणचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
खेड तालुक्यातील भोरगिरी, भिवेगाव, भोमाळे, कारकुडी, खरपूड, वरचे भोमाळे, पाबे, मंदोशी, धुवली, धामणगाव, कुडे, घोटवडी, नायफड, खळशी, एकलहरे आदी गावे आणि वाड्यावस्त्यांवर ही समस्या आहे. बत्ती गुलमुळे गिरणी, मोबाइल बंद सेवा बंद पडल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला आहे आहे. वीजपुरवठा नसल्याने दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दळण दळण्यासाठी वीज नसल्याने पिठाच्या गिरणीत रांगा लागल्या आहेत. तर विजेअभावी मोबाइल सुरू नसल्याने नागरिकांचा संपर्क तुटला आहे.
दरम्यान, या परिसरात सिंगल फेज असल्याने ही समस्या अधिक आहे. मात्र, विद्युत खांब किंवा वीजवाहक तारा तुटलेल्या नसूनही ही समस्या का येत आहे याचा पत्ता लागत नाही. तर याबाबत तक्रार केल्यास तुमची समस्या लवकरच सोडवण्यात येणार असल्याचे उत्तर महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी मिळत असून पुढे मात्र, कार्यवाही होत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.
- अंदाजे वीजबिले देऊन मोकळे
पश्चिम भागात पंधरादिवस सतत झालेल्या अतिवृष्टीमुळे तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित आहे. अजूनही तो पूर्ववत झालेला नाही. अनेक गावात बत्ती गुल आहे. मात्र, त्यांच्या या प्रश्नांवर कोणीही आवाज उठवत नाही. महिनाभर वीज नसताना सर्वसामान्य नागरिकांना अंदाजे वीजबिले देऊन वीज वितरण फासवणूक करीत असताना तालुक्यातील पुढारी मात्र, अधिकाऱ्यांच्या पाठीशी आहेत. कारण ते या विरोधात ते आवाज उठवत नाहीत.