चाकण शहर परिसरातील ओढे-नाले बुजवून इमारतींचे बांधकाम
चाकण – चाकण शहर आणि लगत औद्योगिकरण होत असलेल्या गावांच्या परिसरात ओढा-नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह बदलून व त्यांचे पात्र अरुंद करण्यात येत असल्याचे प्रकार या पावसाळ्यात पुन्हा एकदा समोर आले आहेत. चाकण परिसरात अनेक बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या फायद्यासाठी सिमेंटचे मोठे पाइप जमिनीत गाडून नैसर्गिक ओढे- नाले कृत्रिमरित्या बंदिस्त करून त्यावर मोठमोठे प्रकल्प उभारल्याने “पाण्यात पाय’ ठेवून नैसर्गिक ओढे, नाल्यांची नकाशाद्वारे पाहणी करून प्रवाह बदलणाऱ्या विकासक आणि बांधकाम व्यावसायिकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
मागील पंधरवड्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे चाकण व परिसरातील ओढ्यांनी आपल्या प्रवाहाची दिशा बदलली व वर्दळीच्या रस्त्यावर येत आपले अस्तित्व दाखवले होते. हे नैसर्गिक ओढे, नाले, बंदिस्त केल्याने भविष्यात परिसरातील शेतीला व घरांना पावसाळ्यात गंभीर धोका निर्माण झाल्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत प्रशासनाने पाहणी करून ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्ववत करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. येथील एका खासगी संस्थेच्या इमारतीच्या बांधकामासाठी जमीन सपाटीकरणाला अडथळा ठरणाऱ्या ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह अडविण्यात आल्याचा प्रकार चाकण परिसरात उघडकीस आला; मात्र प्रशासन त्यावर गप्प का राहिले याचे उत्तर अद्यापही गुलदस्त्यातच राहिले आहे.
- प्रशासनाने घेतले झोपेचे सोंग
चाकण परिसरात रस्ता बांधताना अनेक ओढे कायमस्वरूपी बंद वा बुजविण्यात आले आहेत. ओढ्यांचे नैसर्गिक प्रवाह बंद करताना तिथले जलवहनशास्त्र विचारात न घेता नैसर्गिक ओढे कसे बुजवले, त्यामुळे नैसर्गिक व्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. ओढ्यांचे पाणी जाण्याचे पूर्वीचे मार्ग बंद केले आहेत. अनेक वर्षांचे ओढे-नाले गडप करून बांधकामे झाल्याचेही उघड-उघड चित्र दिसत असतानाही याबाबत प्रशासनाने जागेपणी झोपेचे सोंग घेतले आहे. - गंभीर परिणाम भोगावे लागणार
चाकण शहरातील अनेक नैसर्गिक पाण्याचे प्रवाह बदलून ओढ्यांचे व नाल्यांचे अस्तित्व संपविले जात आहे. तसेच, अनेक ओढ्ये-नाल्यांचे पात्र अरुंद करीत त्यावर बांधकामे करण्यात येत आहेत. याबाबत प्रशासनाकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत; मात्र कारवाई झालेली नाही. दरम्यान, बड्या विकसक आणि बांधकाम व्यावसायिकांकडून ओढ्यांचे व नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह वळविण्याचे व त्यांचे पात्र अरुंद करण्याचा गंभीर परिणाम पुढील काळात चाकणकरांना अनुभवण्यास मिळणार आहेत. - नागरिकांचा आरोप असा की…
ओढ्यांचे पाणी जाण्याचे पूर्वीचे मार्ग बंद होत आहेत. अनेक वर्षांचे ओढे-नाले गडप करून बांधकामे झाल्याचेही उघड-उघड चित्र दिसत असतानाही याबाबत प्रशासन डोळ्यावर कातडे ओढण्याची भूमिका घेत आहे. याबाबतची अनियमितता दिसत असली तरी तक्रारी नसल्याने कारवाई कशी करणार, असा उलट प्रश्न प्रशासनाचा आहे. मात्र, नैसर्गिक प्रवाह रोखण्याची हिंम्मत करणाऱ्या मंडळींचे प्रशासनाशी अर्थपूर्ण संबंध आहेत त्यामुळे संबंधित प्रशासनातील कुणीही त्यांच्या डोळ्यात डोळा घालण्याचे धारिष्ट्य दाखवीत नसल्याचा सामान्य नागरिकांचा आरोप आहे.