मुंबई – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणेमार्फत पीएचडी किंवा एमफिलचे शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती यावर्षी (2018) लेखी व तोंडी परीक्षेद्वारे निवड करण्यात आलेल्या सर्व 408 विद्यार्थ्यांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे.
या फेलोशिपसाठी अर्ज दाखल केलेल्या पीएचडी अथवा एमफिलचे शिक्षण घेत असलेल्या सर्व 408 विद्यार्थ्यांना आता या फेलोशिपचा लाभ मिळणार आहे. या संबंधी सर्व पात्र विद्यार्थ्यांना मेलद्वारे कळविण्यात आले आहे.
यासाठी बार्टीमार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार 597 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले होते. यातून लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी, मुलाखत या सर्व प्रक्रिया पूर्ण करून 408 विद्यार्थी पात्रता यादीत होते.
बार्टीच्या नियमाप्रमाणे या पात्र यादीमधून पीएचडीसाठीचे 60% व एमफिल साठी चे 40% असे एकूण 105 विद्यार्थी गुणवत्तेनुसार फेलोशिपसाठी निवडले जातात. परंतु पात्र सर्वच विद्यार्थ्यांना फेलोशिपचा लाभ देण्यात यावा अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती. त्यानुसार निर्णय घेऊन मुंडे यांनी सर्व पात्र 408 विद्यार्थ्यांना ही फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे प्रथम वर्षाकरिता 12 कोटी 18 लाख रुपये इतका वाढीव निधी लागणार असल्याचे बार्टीचे संचालक कैलास कणसे यांनी सांगितले.