प्रभातच्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागे
एन.आर.जगताप,प्रतिनिधी : सासवड कापूरहोळ रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. या रस्त्याच्या रुंदीकरण व विस्तारीकरणाचे काम रोडवेज कन्स्ट्रक्शन या कंपनीला बीओटी तत्त्वावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिले आहे. परंतु सदर रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने चालू असून, या कामात नियमांचे पालन योग्य पद्धतीने केले जात नसल्याची बातमी दैनिक प्रभात ने प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत खडबडून जागे झालेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याचे काम वेगात चालू केले आहे.
सासवडच्या कऱ्हा नदीवरील कमी उंचीचा पूल महापुरा मध्ये वाहून गेला होता. या पुलाचे संरक्षक कठडे देखील वाहून गेले होते. त्यामुळे वाहनांची अत्यंत धोकादायकरीत्या वाहतूक सुरु होती. दैनिक प्रभातने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या ठिकाणी बॅरिकेट बसवले असून, या बॅरिकेटला रिप्लेक्टर हि बसवण्यात आले आहे. यामुळे या पुलावरून काही प्रमाणात का होईना पण सुरक्षित वाहतूक करता येणे शक्य झाले आहे.
केवळ बॅरिकेट बसवुन हा प्रश्न सुटणार नसून लवकरात लवकर या पुलाची उंची वाढवणे व या ठिकाणी नवीन पूल तयार करणे गरजेचे आहे. बॅरिकेट बसवल्यानंतर काही प्रमाणात वाहतूक सुरक्षित झाली असली, तरी मूळ प्रश्न मात्र तसाच आहे. त्यामुळे दुर्घटना व अपघाताचा धोका देखील कायम आहे. संबंधित रोडवेज कन्स्ट्रक्शन या कंत्राट कंपनीने लवकरात लवकर सासवड कापूरहोळ रस्त्याचे काम उरकावे व सासवड येथील कऱ्हा नदीवरील पुलाची दुरूस्ती करून या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
कमलेश्वर घाटाजवळ येईल खचलेला रस्ता बुजवणे गरजेचे
कऱ्हा नदीवरील ज्या पुलावर बॅरिकेट बसवले आहे त्याच्याच जवळ अलीकडे तहसील कार्यालय कडे जाणाऱ्या रस्ता हा महापुरा मध्ये वाहून गेल्यामुळे खचलेला आहे. या ठिकाणी देखील वाहने कऱ्हा नदीच्या पात्रात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने बॅरिकेट बसवले व भराव टाकून हा खड्डा भरणे गरजेचे आहे.