जळोची – परिस्थितीने हतबल झालेल्या आईकडून अवघ्या ४० दिवसांचा दुरावलेला आपल्या पोटचा गोळा तब्बल १२ महिन्यानंतर पुन्हा आईच्या कुशीत आला. दरम्यान ओळखीच्या महिलांकडून बाळाला आश्रमात ठेवू असे सांगून झालेली फसवणूक नंतर त्याच महिलांकडून आईला भेटण्यास व फोनवर बोलण्यास टाळाटाळ तसेच मारहाण.. अशा खडतर परिस्थितीनंतर एक वर्षाचे बाळ आईच्या कुशीत आले आहे. ही घटना आहे बारामतीतील एका विधवा महिलेच्या संदर्भातील…
बारामती शहरापासून हाकेच्या अंतरावर श्वेता परदेशी (नाव बदलले आहे) ही वास्तव्यास आहे. तिला तिच्या दहा वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या पतीपासून तीन मुली आहेत. तिची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने या मुली आश्रम शाळेत शिकण्यासाठी ठेवल्या आहेत. दरम्यान बाळाच्या आईने २०१९ साली स्वप्निल माने (नाव बदलले आहे) याच्याशी ओळख झाली व त्याने लग्नाची मागणी केली.
खंडोबाला साक्षी मानून लग्न –
त्यानुसार त्यांनी जेजुरी येथे जात खंडोबाला साक्षी मानून लग्न केले. स्वप्निल माने यांच्यापासून तिला मुलगी झाली. मधुरा (नाव बदलले आहे) ही मुलगी झाली. मात्र स्वप्निलला मुलगी झाल्याने राग आला. त्याने त्या मुलीला त्याचे नाव न लावता दहा वर्षांपूर्वी मृत झालेल्या पतीचे नाव लावले… मात्र त्याला मुलगा हवा असल्याने त्याने दुसरे लग्न केले…
स्वप्निल सोडून गेल्याने श्वेता हिची खूपच हालाखीची व गरीबीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर श्वेताची मुलगी दोन महिन्यांची असताना अर्चना पवार, हिच्या करवी उज्वला वर्मा, (नावे बदलले आहेत) हिच्या ओळखीने श्वेता हिची दोन महिन्यांची मुलगी पुणे येथील आश्रमात ठेवू, तेथे मुलीचा चांगला सांभाळ करतील, एक दोन महिन्याला तू भेटायला जात जा.. असे गोड बोलून विश्वास संपादन करत तिघींनी मिळून मुलीला पुणे येथे घेऊन गेल्या..
पुण्यात गेल्यानंतर एका ऑफिसमध्ये नेले व तेथे एका तृतीयपंथी इसमाकडे बाळ द्यायला भाग पाडले. त्या इसमाने आधार कार्ड घेत त्यावर सही घेतली. तेव्हा श्वेता हिने अर्चना व उज्वला यांना म्हणाली की, हे काय आश्रम नाही.. मला गोड बोलून कोठे आणले आहे. तेव्हा तृतीयपंथी इसम म्हणाला की, आमच्या आश्रमाचे काम चालू आहे. दोन-तीन महिन्यात पूर्ण होणार आहे. तेव्हा तुम्ही डोळ्याने आश्रम आहे की नाही बघा, असे बोलून अर्चना व उज्वला यांनी श्वेताला ऑफिसच्या बाहेर आणले व तेथून बारामतीला घेऊन आल्या.
फसवणूक झाल्याचे लक्षात आले –
बारामतीत आल्यानंतर एक महिन्यांनी उज्वला हिला फोन केला व आपण बाळाला भेटूया. असे सांगितले असता तिने टाळाळा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अर्चना हिच्याकडे श्वेता गेली व तिला उज्वलाला सांग माझ्या बाळाची गाठ घालून दे… तेव्हा तिनेही टाळाटाळ करण्यास सुरुवात केली..
हा सर्व प्रकार तब्बल पाच ते सहा महिने चालू होता. त्यानंतर श्वेता उज्वला हिच्या घरी गेली व माझे बाळ कुठे आहे? तुम्ही माझ्या बाळाला कोणाच्या ताब्यात दिले आहे? याचा जाब विचारला असता तिने श्वेताला मारहाण केली. तेव्हा तिला आपली फसवणूक झाल्याची खात्री पटली आणि तिने पोलीस ठाणे गाठले.
पोलिसांच्या मदतीने बाळ पुन्हा कुशीत –
सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ दामिनी पथकामार्फत बाळाचा शोध सुरू केला. पुणे येथून बाळाला सुखरूप बारामतीत आणत आईकडे श्वेता तिच्याकडे सुपूर्त केले. परिस्थितीमुळे आई पासून दुरवलेले बाळ पुन्हा आईकडे सोपविण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे (Sub Divisional Police Officer Ganesh Ingle) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश तायडे (Police Inspector Dinesh Tayde), महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक संध्याराणी देशमुख (Female Assistant Police Inspector Sandhya Rani Deshmukh), महिला शिपाई ज्योती जाधव, मोहिनी ढमे, मयूर गायकवाड यांनी मोलाची कामगिरी बजावली. तर बारामतीतील प्रसिद्ध वकील सुधीर पाटसकर, वकील सोमनाथ पाटोळे, वकील अभिजीत जगताप यांनी कायदेशीर बाबी पार पाडत मोलाची भूमिका बजावली..