पुणे – राज्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या निवडणूकीचा निकाल मतदानानंतर तब्बल 17 महिन्यांनी लागला आहे. यात पुणे जिल्ह्यातून चौघे विजयी झाले आहे. निवडणूकीबाबात अनेकांनी आक्षेप नोंदविल्याने निकाल लागण्यास विलंब झाला.
जिल्ह्यातून विजयी झालेल्या चार उमेदवारात पुणे जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. राजेंद्र उमाप यांनी सर्वाधिक मते मिळाली आहेत. त्यांनी मते मिळविण्याच्या बाबतीत राज्यात पाचवा क्रमांक पटकाविला आहे. तर, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी अध्यक्ष ऍड. हर्षद निंबाळकर, ऍड. अविनाश आव्हाड आणि अहमदखान पठाण हे पुन्हा विजयी झाले आहेत. निंबाळकर, आव्हाड आणि पठाण यांनी राज्यात अनुक्रमे 7,8 आणि 25 वा क्रमांक पटकाविला आहे. मूळचे पुणे जिल्ह्यातील असलेले ऍड. विठ्ठल कोंडे देशमुख हे मुंबईतून अर्ज भरून विजयी झाले आहेत. विदर्भातील ऍड. अशिष देशमुख यांनी राज्यात पहिला क्रमांक पटकाविल आहे.