ट्रकचा दुचाकीला धक्का लागल्याने आई गंभीर जखमी
राजगुरूनगर – राजगुरूनगर येथे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर भीमा नदीच्या पुलावर झालेल्या अपघातात वडिलांसह तीन वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला असून, मुलीची आई जखमी झाली आहे. ही घटना शनिवारी (दि. 11) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास घडली.
पुणे- नाशिक महामार्गावरून नाशिककडे ट्रक (एमएच 15 जीबी 7275) जात होता. त्याचवेळी मंचर येथे दुचाकीवरून (एमएच 14 डीएल 1557) सतीश बाळकृष्ण वळसे-पाटील (वय 35) मुलगी आरोही सतीश वळसे पाटील (वय 3) आणि जयश्री सतीश वळसे पाटील (सर्व रा. निरगुडसर, ता. आंबेगाव ) हे गावाला थापलिंग यात्रेनिमित्त निघाले होते. राजगुरूनगरजवळील पुणे-नाशिक महामार्गावरील भीमा नदीवरील पुलावरून जात असताना ट्रकचा धक्का दुचाकीला लागल्याने दुचाकीवरील सतीश वळसे पाटील व मुलगी आरोही हे दोघेजण ट्रकच्या चाकाच्या खाली येऊन जागीच मृत्युमुखी पडले.
पत्नी जयश्री यांना गंभीर दुखापत झाली आहे. ट्रक चालक ज्ञानेश्वर सखाराम गोटेकर (वय 40, रा. वाळवी, ता. सिन्नर, नाशिक) यांस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघाताबाबत सतीशचा चुलत भाऊ संतोष केशव वळसे पाटील यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुलगी व वडील यांना तात्काळ चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तिथे शवविच्छेदन करून वडिलाचा व मुलीचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
सतीश हे पिंपरी काळेवाडी येथे एका खासगी कंपनीत कामाला होते. तेथे ते कुटुंबासह राहत होते. आज (दि. 11) गावाकडे यात्रा असल्याने दुचाकीवरून गावाकडे जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. पुढील तपास खेडचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश बडाख करीत आहेत.