गटा-तटाचे राजकारण : गावकारभाऱ्यांकडून अपप्रवृत्तीला खतपाणी
भिगवण – भिगवण परिसरात तरुणवर्गात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. गटा-गटाने वावरणे, दहशत निर्माण करणे आदी प्रकार नित्याचेच झाले आहेत. यातून समाजस्वास्थ्य बिघडत असून पालकांनी सजग राहण्याची गरज निर्माण झाली आहे. गावकुसातील शहरी तोंडवळा लाभलेल्या तरूणांमध्ये आता भाईगिरीची क्रेझ वाढली आहे. त्यामुळे व्यसनाधीनतेच्या वाटेवर स्वार झालेली तरूणाई विघातक मार्गावर जात असल्याचे विदारक चित्र आता इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात सर्रास दिसत आहे.
भिगवण परिसरातील एका शाळेच्या कार्यक्रमात धक्का लागल्याच्या कारणावरून वाद उफाळला. या वादाचे पर्यावसन चाकू हल्ल्यात झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. किरकोळ कारणांवरून दहशत निर्माण करण्याचे गंभीर गुन्हे करण्याचे प्रकार घडत आहेत.
युवकांमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी विक्षिप्त प्रकार सुरू आहेत. वाढदिवसासाठी आणलेला केक ज्याचा वाढदिवस आहे. त्याच्या अंगास फासणे, चिकट टेपने बांधणे, मारहाण करणे आदी प्रकार घडत आहेत. त्यामुळे शाळा – महाविद्यालयांतील वातावरण दूषित झाल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकरणांची दखल पोलीस यंत्रणेला घ्यावी लागली आहे.
पालकवर्गात या प्रकाराबद्दल अनभिज्ञता आहे. काही पालक पाल्यांच्या गैरप्रकारांना पाठीशी घालताना दिसत आहेत. पालकांकडून मोटारसायकल व अतिरिक्त पैशाची उपलब्धता आहे. त्यामुळे मुलांची दिशा भरकटत आहे. तरुणांच्या वैचारिक अवकाशाला दिशा देणारे खाद्य समाजाने उपलब्ध करून द्यायला हवे. नोकरी मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकासाचे उपक्रम व्हायला हवेत. युवकांच्या मानसिक जडणघडणीत समाजाने योगदान द्यायला हवे. तरच भावी पिढी भरकटलेल्या मार्गावरून दूर होईल.
समाजाने व पालकांनी पाल्यांच्या वेळ, विचार व प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवायला हवे. युवकांसमोर आदर्श गुन्हेगारी प्रवृत्तीचे नसावेत. समाज व राष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या व्यक्तींना आदर्श मानावे. कायदा आणि संस्कार यांच्या मेळानेच युवकांमध्ये बदल होऊ शकेल.
– जीवन माने, सहायक पोलीस निरीक्षक, भिगवण.