आबूधाबी – आयपीएल स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर बेंगळुरू यांच्यात होणारा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. राजस्थान रॉयल्स व चेन्नई यांच्या विजयांमुळे अनेक संघांची डोकेदुखी वाढली आहे. जरी चेन्नईचे या स्पर्धेतील आव्हान संपले असले तरीही त्यांनी त्यांचे उर्वरित दोन सामने जिंकले तर ते क्रमवारीतील अव्वल संघांचेही स्थान डळमळीत करू शकतात. त्यामुळे याच सामन्यासह प्ले-ऑफवरील दावेदारी आणखी घट्ट करण्यासाटी मुंबई व बेंगळुरू यांना विजय आवश्यक बनलेला आहे.
यंदाच्या स्पर्धेत अपयशी सुरुवातीनंतर बेंगळुरू संघाने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. कर्णधार विराट कोहली व एबी डीविलियर्स भरात आल्याने मुंबईच्या गोलंदाजांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
या स्पर्धेच्या 2008 सालच्या पहिल्या मोसमानंतर आजवर बेंगळुरूला एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. संघात कोहली, डीविलियर्स यांच्यासह जागतिक क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू असूनही त्याच्या संघाला सातत्याने अपयशाचाच सामना करावा लागला आहे. आता मुंबईविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत त्यांना जबाबदारीने खेळ करावा लागणार आहे.
दुसरीकडे रोहित शर्माच्या दुखापतीने मुंबईच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. जरी त्याची दुखापत गंभीर नसली तरीही त्याला गेल्या दोन्ही सामन्यांत खेळता आलेले नाही. त्याच्या अनुपस्थितीत कॅरन पोलार्डने नेतृत्व केले आहे.
पोलार्डसह हार्दिक पंड्या, इशान किशन यांनी गेल्या चारही सामन्यांत प्रतिस्पर्धी संगांच्या गोलंदाजीवर वर्चस्व राखले होते. आजही त्यांच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. त्यातही जर रोहित पूर्ण तंदुरुस्त ठरला तर त्यांची फलंदाजी जास्त भक्कम होणार आहे. अशा स्थितीत बेंगळुरूच्या गोलंदाजांसमोर आणखी मोठे आव्हान उभे राहणार आहे.
दोन्ही संघांचे बलाबल पाहिले तर ते समसमान वाटते. मात्र, महत्त्वाच्या सामन्यांत हाराकिरी पत्करण्याची सवय बेंगळुरूला सातत्याने त्रासदायक ठरली असल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे कोहली आणि कंपनीला जास्त सतर्क राहावे लागणार आहे.
मुंबई संघाने या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक 4 वेळा विजेतेपद मिळवले आहे तर, बेंगळुरूला एकदाही यश मिळालेले नाही. दोन्ही संघांची फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण तोडीसतोड आहे. मात्र, प्रत्यक्ष मैदानावरची कामगिरी पाहिली तर मुंबईच जास्त सरस वाटते. अर्थात, कोहली व डीविलियर्स कोणत्याही परिस्थितीत सामन्याचा निकाल फिरवू शकतात त्यामुळे मुंबईला गाफील राहता येणार नाही.
रोहितची उणीव जाणवणार
मुंबईचा संघ जरी कर्णधार रोहित शर्मावरच अवलंबून नसला तरीही त्याचा अनुभवच महत्त्वाचा ठरत आहे. त्यातही त्याची बॅट तळपली तर संघाला मोठी धावसंख्याही उभारण्यात यश येते. त्याला दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकावे लागले आहे. आजच्या सामन्यात तो सहभागी होणार नसल्याने त्याची उणीव संघाला निश्चितच जाणवणार आहे. त्यामुळे फलंदाजीचा सर्व भार पोलार्ड, पंड्या व किशन यांच्यावरच अवलंबून राहणार आहे.
सामन्याची वेळ
(भारतीय प्रमाण वेळेनुसार)
सायंकाळी : 7ः30
ठिकाण : आबूधाबी
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टसवर