कोलकाता: गुलाबी चेंडूने खेळल्या जात असलेल्या भारतातील पहिल्या दिवसरात्र कसोटी सामन्याच्या शुक्रवारच्या पहिल्याच दिवशी बांगला टायगर्स म्हणून ओळखल्या जात असलेल्या पाहुण्या बांगलादेशचे फलंदाज कागदी वाघ नव्हे तर मनीमाऊ ठरले. भारतीय गोलंदाजांसमोर केवळ 106 धावांतच त्यांचा संघ गारद झाला व भारतीय संघाने पहिल्याच दिवशी वर्चस्व प्रस्थापित केले. कर्णधार विराट कोहली व चेतेश्वर पुजारा यांच्या अर्धशतकी खेळीने भारताने पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा आपल्या पहिल्या डावात 3 बाद 174 धावा केल्या असून 68 धावांची आघाडी घेतली आहे. खेळ थांबला तेव्हा कोहली 59 तर अजिंक्य रहाणे 23 धावांवर खेळत आहेत.
आज पहिल्या कसोटीतील यशस्वी सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा व मयांक आग्रवाल अपयशी ठरले. मात्र त्यानंतर पुजारा आणि कोहलीने संघाचा डाव सावरला व महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. पुजारा बाद झाल्यावर रहाणेने कोहलीला सुरेख साथ देत संघाचे आणखी नुकसान होऊ दिले नाही. नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्याच अंगलट आला. या ऐतिहासिक सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाजंच्या त्रिकुटाने बांगलादेशच्या फलंदाजांना चांगलेच नाचविले. ईशांत शर्माने त्यांचा अर्धा संघ तंबूत पाठविला. त्याला योग्य साथ देताना उमेश यादव आणि महंमद शमी यांनीही भिषण वेगवान गोलंदाजी केली. त्याचा संपूर्ण संघ केवळ 106 धावांत बाद झाला. ईशांत शर्माने सामन्यात 5 बळी घेतले. उमेश यादवने 3 तर शमीने 2 बळी घेत आपला वाटा उचलला. 15 षटके पुर्ण होण्यापूर्वीच त्यांचा अर्धा संघ तंबूत परतला होता. ईशांतने इमरुल कायसला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. हा झेल रोहित शर्माने अफलातून घेतला.
10 व्या षटकात उमेश यादवने पहिल्याच चेंडूवर कर्णधार मोमिनूल हकला भोपळाही फोडू दिला नाही. चहापानापर्यंत बांगलादेशची अवस्था 6 बाद 73 अशी बिकट झाली. शादमान इस्लामने 29 धावांची खेळी केली. त्याला एकाही फलंदाजाने चांगली साथ दिली नाही. तीन फलंदाज तर भोपळा न फोडता माघारी परतले. कसोटी कर्णधार या नात्याने 5 हजार धावा काढणारा विराट पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याने 86 डावांमध्ये ही कामगिरी करत माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉंटिंगचा विक्रम मोडला आहे. रिकी पॉंटिंगने 97 डावांमध्ये याआधी अशी कामगिरी करून दाखवली होती.
रोहितचा अफलातून झेल
बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 षटकांच्या आतच बांगलादेशचा अर्धा संघ माघारी परतला. रोहित शर्माने स्लीपमध्ये कर्णधार विराट कोहलीकडे आलेला झेल सूर मारून इतका अप्रतिम घेतला की सगळ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. 10 व्या षटकात उमेश यादवच्या चेंडूवर कर्णधार मोमिनूल हकला भोपळाही फोडता आला नाही. स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहितने सूर मारत मोमिनूलचा झेल घेतला. खरेतर हा झेल कोहलीचा होता, मात्र रोहितने हवेत उडी घेत हा झेल घेतला. याच सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकताना साहाने सर्वात कमी सामन्यात यष्टीमागे 100 बळी मिळविले. ईशांत शर्माच्या गोलंदाजीवर महंमदुल्लाच्या बॅटची कड घेऊन विराट कोहलीच्या दिशेने जाणारा चेंडू साहाने उडी मारत एक अफलातून झेल घेतला.