नवी दिल्ली – दिल्लीतल अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने दिल्लीत फटाक्यांवर निर्बंध घातल्यामुळे बऱ्याच चर्चा सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्या राज्याचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी आपली भूमिका मांडली आहे. आम्हाला राजकारण करायचे नाही. दिल्लीच्या लोकांचे प्राण वाचवण्याला आमचे प्राधान्य आहे. लोकांनी फटाके फोडू नयेत असे आवाहन त्यांनी केले आहे.
या विषयावर जे काही राजकारण सुरू आहे त्याबद्दल मला काही बोलायचे नाही. ज्यांना राजकारण करायचे आहे त्यांनी ते करावे. काही लोकांनी सर्वोच्च न्यायालयाचेही दार ठोठावले होते. मला वाटते न्यायालयाच्या निर्णयानंतर आता यावर कोणता वाद करण्याची गरज नाही. जेव्हा आपले पूर्वज दिवाळी साजरी करायचे तेव्हा ते फटाके फोडत नव्हते. कारण तेव्हा फटाके नव्हते. लोकांचा जीव वाचवणे हीच सर्व धर्मांची प्राथमिकता आहे.
दरवर्षी हिवाळ्यात प्रदूषणाच्या पातळीत मोठ वाढ होते. आपण दिवाळी दरवर्षी साजरी करतो. आताही ती साजरी करू. पण फटाके फोडू नयेत. कारण प्रत्येक दिवाळीनंतर श्वास घ्यायलाही त्रास होतो. सरकारचा फोकस हा लोकांना जागरूक करणे हा आहे असे राय यांनी म्हटले आहे.