नवी दिल्ली – दिल्लीत प्रजासत्ताक दिनी झालेल्या शेतकऱ्याच्या मृत्यू प्रकरणी चुकीची माहिती देणारे संदेश सोशल मिडीयावरून प्रसारीत केल्याच्या कारणावरून कॉंग्रेसचे ज्येष्ठ लोकसभा सदस्य शशी थरूर आणि अन्य ज्येष्ठ पत्रकारांवर देशद्रोहासारखे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तथापि यावरून यापैकी कोणालाही अटक करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज मनाई हुकुम जारी केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता पंधरा दिवसांनंतर होणार आहे. सरन्यायाधिश बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने आज हा निर्णय दिला.
यावर दिल्ली पोलिसांच्यावतीने बोलताना सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी आरोपींना कोणतीही सवलत देण्यास विरोध दर्शवला आणि या प्रकरणी पुढील सुनावणी उद्याच घेण्याची विनंती केली. पण त्यांचा आरोपींचे वकिल कपिल सिब्बल यांनी जोरदार प्रतिवाद केला. यावर कोर्टाने स्पष्ट केले की या प्रकरणी आम्ही संबंधीतांना नोटीसा जारी करणार आहोत, तो पर्यंत काहीही होणार नाही.
या प्रकरणात शशी थरूर यांच्या खेरीज ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई, मृणाल पांडे, जफर आगा, विनोद जोस, परेश नाथ आणि अनंत नाथ हे आरोपी आहेत, त्यांनी आपल्यावरील गुन्हे रद्द करावेत अशी मागणी करणारी याचिका केली आहे.
या आरोपींच्या विरोधात पाच राज्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. समाजात शत्रुत्व निर्माण करणे, खोट्या बातम्या पसरवणे आदि कारणांवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर थेट देशद्रोहाचेच गुन्हे काही ठिकाणी लावण्यात आले आहेत.