भवानीनगर -करोनाच्या महामारीमुळे संपूर्ण देश अडचणीत सापडला आहे. दुसरीकडे या महामारीमुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने आणि अवकाळीच्या माध्यमातून येणाऱ्या निसर्गाच्या संकटामुळे बळीराजा महामारीमुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे.
इंदापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील द्राक्ष बागांमध्ये एका झाडास साधारण दहा किलोच्या पुढे द्राक्षे निघेल एवढे द्राक्षाचे घड लागलेले दिसत होते. यामुळे शेतकरी यावर्षी द्राक्ष पिकातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळणार या आशेवर अवलंबून होते. साधारण दरवर्षी एका किलो 35 ते 40 रुपये हा दर शेतकऱ्याला मिळत होता.
याहीवर्षी हाच दर शेतकऱ्यांना मिळेल अशी अपेक्षा होती. त्यातच द्राक्ष बागांना दरवर्षीपेक्षाही जास्त प्रमाणात द्राक्षे लागल्याने सर्व झाडे द्राक्षाच्या घडाने लगडली होती. तालुक्यातील परिसरातील द्राक्ष बागा विक्रीस आल्या असता अचानक या देशावर आलेल्या महामारीच्या संकटात सापडल्या, त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील द्राक्षे एक्सपोर्ट करता आली नाहीत.
त्यामुळे या शेतकऱ्यांना द्राक्षे कशी खपवावी असा प्रश्न पडलेला आहे. काही ठिकाणी स्थानिक विक्रेते द्राक्ष बागेमध्ये येऊन फक्त पंधरा रुपये किलो दराने मागणी करत होते. यावेळी शेतकऱ्यांच्या डोळ्यात फक्त पाणी येत होते. द्राक्ष लागवडीसाठी आजपर्यंत झालेला खर्च देखील या शेतकऱ्यांच्या पदरात पडलेला नाही. द्राक्ष पिकल्यानंतर जास्त दिवस वेलीला राहू शकत नाही.
महामारी व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मात्र अतोनात आर्थिक नुकसान झालेले आहे. यातून शेतकरी बाहेर पडणे सध्या तरी कठीण झाले आहे.
याचबरोबर काही शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारचे उत्पादन मिळणारे एक महत्वाचे पीक म्हणून केळीची या केळीची लागवड केली. इंदापूर तालुक्यात अनेक भागांमध्ये केले जाते. परंतु यंदा निसर्गानेही साथ दिली नाही. आकाशामध्ये ढग तयार होऊन जोराच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने फटका दिल्याने या असलेल्या केळीच्या बागाही अनेक ठिकाणी पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत.