पुणे – शहराचे सांस्कृतिक वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराला गेल्या वर्षभरापासून टॅंकरद्वारे पाणी द्यावे लागत आहे. रंगमंदिरासाठी स्वतंत्र नळजोड असला, तरी त्याला पाणीच येत नसल्याने दिवसाला तीन टॅंकर पाणी नाट्यगृह व्यवस्थापनास मागवावे लागत आहे.
या नाट्यगृहाच्या खालील बाजूस जिवंत झरा आहे. त्या पाण्यामुळे इमारतीला नुकसान होत असल्याने महापालिकेने तो बंद करून पाणी इतरत्र वळवले आहे. मात्र, आता नाट्यगृहालाच पाणी मिळत नसल्याचे वास्तव आहे. त्याच वेळी शेजारी जलतरण तलाव, महामेट्रो, छत्रपती संभाजी महाराज उद्यानास मात्र मोठ्या प्रमाणात पाणी मिळत आहे. दरम्यान, दरवर्षी लाखो रुपयांचा महसूल मिळवून देणाऱ्या बालगंधर्व रंगमंदिराबाबत महापालिकेची अनास्था पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आली आहे.
दरम्यान, नाट्यगृहाला दैनंदिन स्वच्छता, एसी तसेच इतर कामांसाठी पाणी आवश्यक असते. सभागृहाच्या मागील बाजूस 80 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बसवलेली आहे. आता त्यात दरारोज सुमारे 6 टॅंकर पाणी मावते. गेल्या वर्षभरापासून या टाकीत पाणीच येत नसल्याने स्वच्छता तसेच इतर कामांवर परिणाम झाला असून, पाणी कमी पडल्यास वेळेवर टॅंकरही उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेकदा नाटयरसिक तसेच नाट्यसंस्थांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याशिवाय अनेकदा शनिवारी, रविवारी येथे गर्दी अधिक असल्यास पाणी कमी पडत आहे. गुरुवारी तर टॅंकर बंद असल्याने पाणीच नसल्याने मोठी गैरसोय होते.
आम्ही पाणी देणार नाही : अनिरुद्ध पावसकर
बालगंधर्व रंगमंदिराच्या स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी वापरतात. त्यामुळे त्यांनी बोअरवेल आणि इतर पर्याय शोधावेत. पाणीपुरवठा विभागाकडून त्यांना पाणी देता येणार नाही, अशी भूमिका विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी घेतली आहे. मात्र, त्याच वेळी इतर नाट्यगृहांना पिण्याचे पाणी का दिले जाते याबाबत विचारणा केली असता “तिथे कमी पाणी लागते. तसेच पाणी पुरवठाही जास्त आहे,’ असे सांगत त्यांनी वेळ मारून नेली.
पावसकर म्हणाले, “बालगंधर्व रंगमंदिर हे त्या भागातील जलवाहिनीच्या शेवटच्या भागात आहे. गेल्या काही वर्षांत या भागात लोकवस्ती वाढली आहे. नवे नळजोड दिलेले आहेत. त्यांना पाणी कमी पडते. त्यामुळे त्यांनी पिण्याचे पाणी न वापरता इतर पाणी शोधावे, असे भवन विभागाला आधीच सांगितले.’ यावर “नळाद्वारे नाही तर टॅंकरने का पिण्याचे पाणी देता?’ अशी विचारणा केली असता त्यांना उत्तर देता आले नाही.
या उलट “बालगंधर्व’च्या अंतर्गत जलवाहिन्या वेड्यावाकड्या असून त्या भवन विभागाने दुरुस्त कराव्यात. मग पाणी जास्त येईल. पाणी देणे आमची जबाबदारी नाही ते भवन विभागाने काय ते करावे, असे सांगत पाणी पुरवठा विभागाच्या प्रमुखांनी आपली जबाबदारी झटकली आहे.
…अन् भीती खरी ठरली
बालगंधर्व रंगमंदिरासाठी महापालिकेचा स्वतंत्र नळजोड होता. मात्र, दीड वर्षांपूर्वी या नळजोडावर महामेट्रो तसेच पोलीस चौकीस स्वतंत्र नळजोड देण्यात आला आहे. असे केल्यास रंगमंदिराचे पाणी कमी होईल, अशी भीती तत्कालीन व्यवस्थापकांनी व्यक्त केली होती. तसेच नळजोड देताना विरोधही केला होता. मात्र, त्यांना डावलत पाणीपुरवठा विभागाने रंगमंदिराचे पाणी कमी करत या दोन्ही यंत्रणांना पुरवठा केला आहे.
रंगमंदिरात गेल्या वर्षभरापासून कमी पाणी येत आहे. ही बाब लक्षात आल्यापासून दररोज 3 ते 4 टॅंकर मागविले जातात. नळजोडातून जादा पाणी मिळावे यासाठी पाणीपुरवठा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, असे विजय शिंदे (व्यवस्थापक, बालगंधर्व रंगमंदिर) म्हणाले.