आपल्या लक्षात असेलच की आरोग्याच्या तीन पायांपैकी, तीन आधारांपैकी निद्रा हा एक पाय, एक आधार. रोजच्या कामामुळे, दगदगीमुळे शरीर, मन थकून जाते. निद्रेमुळे या थकलेल्या शरीर-मनाला पुन्हा तरतरी येते. नवा उत्साह येतो. थोडक्यात रोज झालेली झीज भरून निघते. त्यामुळे रोज पुरेशी झोप घेणे आरोग्य टिकविण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
आता पुरेशी म्हणजे नेमकी किती? पाच तास, सहा तास, सात की आठ तास? इथे पुन्हा एकदा आपल्या शरीराला विचारावे लागेल जसे प्रत्येकाची तहान निराळी, भूक निराळी त्याचप्रमाणे प्रत्येकाची झोपेची आवश्यता निराळी. कोणाला पाच तास झोप पुरेल तर कोणाला आठ तास झोप पुरेशी ठरेल. त्याची प्रकृती, शरीराची जडण-घडण, त्याच्या कामाचे स्वरूप, राहण्याचा प्रदेश अशा अनेक गोष्टींवर त्यांची झोप ठरेल. शरीर-मन मजबूत तर झोपेची गरज कमी. शरीर-मन दुर्बल तर झोपेची गरज जास्त. थंड प्रदेशात कमी तर उष्ण प्रदेशात जास्त, शारीरिक काम कष्टाचे तर झोपेची गरज जास्त, बैठे काम तर गरज कमी.
त्यामुळे किती झोप घ्यावी हे ज्याने त्याने ठरवावे. एक मात्र नक्की की सकाळी उठल्यावर फ्रेश वाटले पाहिजे. ताजेतवाने वाटले पाहिजे. असे वाटणे म्हणजेच आपली झोप पूर्ण झाली. थकवा निघून गेला. आता काम करायला शरीर पुन्हा तयार. त्याप्रमाणे अनेक कारणांमुळे आपली तहान भूक बदलत राहाते. त्याचप्रमाणे आपली झोपेची गरजसुद्धा बदलत रहाणार. आपले कामाचे स्वरूप बदलले, कामाचे ठिकाण बदलले, वय वाढले अशा अनेक कारणाने आपली झोपेची गरज बदलत जाईल. आपण त्यानुसार बदलणे महत्त्वाचे. कधी जास्त झोप लागेल तर कधी कमी.
शरीराच्या गरजेपेक्षा झोप कमी पडली तर शरीरात पित्त व वात हे दोन घटक वाढतील व त्यामुळे होणारे सर्व आजार शरीरात घर करतील. गाडी दिवसभर पळवली, तिचे इंजिन गरम झाले, घरी आल्यावर पार्किंगमध्ये लावली पण इंजिन चालूच ठेवले तर ते थंड होणारच नाही. गरमच राहील. त्याचप्रमाणे ही शरीराची गाडी जर रात्री बंद केली नाही तर गरमच राहील. म्हणजेच पित्त वाढेल, उष्णता वाढेल. तसेच या थकलेल्या शरीराला विश्रांती मिळाली नाही तर त्याचा थकवा टिकून राहील आणि थकवा म्हणजेच वाढलेला वात. अशा रितीने झोप कमी झाल्यास वात-पित्ताचे व्याधी होतील.
एक सॉफ्टवेअर क्षेत्रातला तरुण. दिवस-रात्र काम करणारा. झोप म्हणजे काय विसरूनच गेलेला. त्याच्याकडे तक्रारींची मोठी लिस्ट. सर्व तक्रारी वात-पित्ताच्या. त्याची अवस्था अशी होती की, त्याला समोरच्या टेबलावर डोके टेकून झोप म्हटले असते तर एका सेकंदात झोपी गेला असता. झोप त्याच्या डोळ्यात मावत नव्हती.
त्याला प्रिस्क्रिप्शन् दिले की, घरी जाऊन झोपायचे व झोप पूर्ण करूनच उठायचे. मग 24 तास लागोत का 36 तास. मुख्य म्हणजे एकही औषध दिले नाही. आणि त्यानेसुद्धा तसेच केले. घरी जाऊन चांगला 24-25 तास झोपला. जागा झाल्यावर त्याला एकदम फ्रेश वाटले. शरीराची एकसुद्धा तक्रार शिल्लक राहिली नाही.
अशाच एक बाई. त्यांच्याही तक्रारी वात-पित्ताच्या. त्यांच्या दिनक्रमाविषयी आश्चर्यच वाटले. एकदमच योग्य दिनक्रम. पहाटे पाचला उठून तयार होऊन आठला ऑफिस गाठायचे आणि ऑफिसमधून संध्याकाळी पाचला घरी यायच्या. वा! ऐकून एकदम बरे वाटले. विचार केला आता बाई लवकर जेवण आटपून लवकर झोपी जातील. पण, इथे अंदाज चुकला. त्या बाई थोडा आराम करून, तयार करून संध्याकाळी 7.30-8 ला करमणुकीसाठी क्लबमध्ये जायच्या. यायला वाजायचे बारा. म्हणजे जेमतेम झोप पाच तास आणि असे चालले होते अनेक वर्षे.
चेहऱ्यावर, हातावर किचिंत सुरकुत्याही दिसत होत्या. पण, वय निघाले 36-37 च्या दरम्यान. थोडक्यात म्हणजे त्या त्यांच्या वयापेक्षा जास्त मोठ्या दिसत होत्या. अत्यंत अपुरी अशी झोप. वर्षोनुवर्षे अशाच पद्धतीने झोपल्या होत्या. म्हणून रोजच शांत न होणाऱ्या वाताने भंडावले होते त्यांना. ज्यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य हवे असेल त्यांनी पुरेशी झोप घेणे अत्यावश्यक आहे.
वरील सर्व माहिती वाचून आता तुमच्या लक्षात आले असेल की, झोपेला इतके महत्त्व का दिले आहे ते. एकीकडे अशी झोपेची आबाळ करणारे अनेक माणसे सध्या दिसत असतात. दुसरीकडे अनेक कुंभकर्णही दिसतात. जसे कमी झोप वाईट, तशीच जास्त झोपही दुष्परिणामकारक.
====================
==========