पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरातील पाणीगळती रोखण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून उपाययोजना सुरू आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. महापालिकेने पाणी पुरवठ्यासाठी २४७ ठिकाणी मुख्य जलवाहिन्यांवर पाणीमीटर बसवले.
तसेच जलकेंद्रात सुरू असलेली गळती रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्याने महापालिकेस दररोज तब्ब्बल २०० एमएलडी पाणी वाचविणे शक्य झाले आहे. हे पाणी भामा- आसखेड धरणातून शहराच्या पूर्व भागासाठी घेतल्या जाणार्या पाण्याएवढेच आहे. त्यामुळे महापालिकेचे वर्षाला तब्बल २६ कोटी रुपये वाचणार आहेत. त्यातच, पाण्याचे नियोजनही योग्य पद्धतीने करणे शक्य होणार आहे.
धरणसाखळीत यंदा कमी पाण्याचा कमी साठा आहे. त्यामुळे शहराच्या लोकसंख्येनुसार महापालिकेने पाण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे केली. परंतु सध्या जितके दिले जाते तितकेच पाणी वापरण्याचे आदेश जलसंपदा विभागाने दिले आहेत. हे पाहता, महापालिकेला पाण्याचे नियोजन करावेच लागणार आहे. त्यासाठी महापालिकेने जलकेंद्र तसेच जलवाहिन्यांवरील गळती शोधण्याची मोहीम हाती घेतली.
यात पर्वती आणि वारजे जलकेंद्रांत सुमारे ४५ एमएलडी पाण्याची गळती सापडली. तर, पद्मावती पंपिंग स्टेशनला पाणीपुरवठा करणार्या आंबिल ओढ्यातील जलवाहिनीवर ५ एमएलडी गळती बंद करण्यात आली. मांजरी आणि फुरसुंगीला बंद पाइपलइनमधून पाणीपुरवठा केला जात आहे. पूर्वी या दोन्ही गावांना कालव्यातून थेट पाणी दिले जात होते. मात्र, त्यासाठी धरणातून १५० एमएलडी पाणी सोडावे लागत होते. हे पाणीही आता बंद झाले आहे.
असे केले नियोजन
महापालिकेकडून समान पाणी पुरवठयासाठी शहराचे १४१ झोन केले आहेत. या झोनला मुख्य जलवाहिनीतून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या निकषावर प्रत्येक झोनला पाणी दिले जात आहे. यापूर्वी हे पाणी मोजले जात नव्हते. मात्र, आता मुख्य जलवाहिनीवर मीटर बसवल्याने जलकेंद्रातून सोडलेले पाणी आणि झोनपर्यंत पोहचलेले पाणी याची प्रत्येक दिवशी मोजणी केली जात आहे. त्यामुळे पाण्याची गळती नक्की कोठे आहे, हे समजण्यास मदत होत आहे.
मागील दोन महिन्यांत सुमारे २०० एमएलडी पाण्याचा वापर कमी केला आहे. त्यातील प्रत्यक्ष गळती ५० एमएलडीची रोखली असून फुरसुंगी. मांजरीसाठी घ्यावे लागणारे अतिरिक्त पाणी बंद झाले आहे. त्यामुळे दररोज १५० एलएलडी पाणी कमी झाले आहे. – नंदकिशोर जगताप, पाणीपुरवठा विभाग प्रमुख, मनपा