मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्रासह इंधनाववरील मूल्यवर्धित कर कमी न करणाऱ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना चांगलेच सुनावले होते. पंतप्रधानांनी इंधन दरवाढीसाठी राज्यांना जबाबदार धरल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आकडेवारी प्रसिद्ध करत पंतप्रधानांचा दावा खोडून काढला होता. पंतप्रधान मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे असा हा संघर्ष पाहायला मिळाल्यानंतर ठाकरे यांनी आज एका ववृत्तसंकेतस्थळाशी बोलताना अनेक मुद्द्यांना हात घातला आहे.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी, पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत आपले चांगले संबंध असल्याचे देखील सांगितले. गुजरातेत झालेल्या दंग्यांनंतर मोदी यांना हटवा अशी मागणी जोर धरत असताना बाळासाहेबांनी मोदींची कशाप्रकारे पाठराखण केली होती याबाबतचा किस्सा देखील ठाकरे यांनी सांगितला.
मोदी हटाओची मागणी जोर धरत असताना…
‘गोध्रा दंगल आणि गुजरात हिंसाचारानंतर मोदी हटाओ मोहीम चालवली गेली होती. त्यावेळी लालकृष्ण अडवाणींनी बाळासाहेबांना विचारले की मोदींना हटवायला हवे का? तुम्हाला काय वाटते. तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते, ‘त्यांना हात लावू नका. मोदी गेले तर गुजरात गेला.’ असा किस्सा उद्धव ठाकरे यांनी सांगितला. ‘मोदींशी माझे अजूनही संबंध आहेत, पण याचा अर्थ आमच्यात युती होईल असा नाही,’ असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर दिलं कारण…
ठाकरे यांनी यावेळी मोदींनी इंधनावरील कर कपातीबाबत केलेल्या दाव्याचा प्रतिवाद करण्यामागचे कारण देखील सांगितले. ते म्हणाले, “मी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर दिलं कारण त्यांनी आधी अनपेक्षितरित्या महाराष्ट्राला उगाच बोल लावले. त्या बैठकीचा तो मुद्दा नव्हता, ती बैठक करोनाबाबत होती. साहजिकच मला खरी आकडेवारी देणं भाग होतं. माझ्या जनतेचा गैरसमज होता कामा नये हा माझा त्यामागचा उद्देश होता.”
राज ठाकरेंना टोला
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवा अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवू अशी भूमिका घेतली आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण भलतेच तापले आहे. एकीकडे महाविकास आघाडी सरकाचा भाग झाल्यापासून हिंदुत्वापासून फारकत घेतल्याचा आरोप सातत्याने होत असलेल्या शिवसेनेला विरोधक यावरून कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करतायेत. तर दुसरीकडे शिवसेनेने देखील आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय.
राज ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे टीका करताना उद्धव ठाकरे यांनी, ‘असे भोंगेधारी, पुंगीधारी फार पाहिले आहेत’ असा टोला लगावला.