अलमट्टीतून पाणी सोडण्यास उशीर झाल्यामुळे परिस्थिती गंभीर
मुंबई (प्रतिनिधी) – महाराष्ट्रात धुवांधार कोसळणाऱ्या पावसामुळे नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकणात महापूराने थैमान घातले आहे. पुरग्रस्त भागातील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून प्रशासन व एनडीआरएफचे बचावकार्य अपुरे पडत आहेत. त्यामुळे सरकारने पूरग्रस्त भागात मदत बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण करावे.
तसेच पुरग्रस्त महाराष्ट्रासाठी केंद्र सरकारने तातडीची मदत म्हणून 4 हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, गेल्या पाच सहा दिवसांपासून राज्यात भयंकर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांमधील लाखो लोक पूरामुळे बेघर झाले आहेत. लाखो लोक पूराच्या पाण्यामध्ये अडकून पडले आहेत, त्यांना मदतीची गरज आहे. पण महाजनादेश यात्रेच्या जल्लोषात व्यस्त असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत पूरग्रस्तांच्या व्यथा पोहोचू शकल्या नाहीत हे दुर्देव आहे.
एवढी गंभीर परिस्थिती असताना चार-पाच दिवस पालकमंत्री जिल्ह्यात फिरकलेही नाहीत. त्यामुळे या सरकारमध्ये पालकमंत्री फक्त ध्वजारोहण करण्यासाठीच नेमले आहेत का? असा संतप्त सवाल त्यांनी केला. पूर ओसरल्यावर रोगराई पसरण्याची भीती आहे, त्यामुळे परिस्थिती अजून गंभीर होईल. मदत आणि बचावकार्याला वेग देण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणीही त्यांनी केली.
अलमट्टी धरणातून पाणी सोडण्यास उशीर झाल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली. राज्य सरकारने कर्नाटक सरकारच्या संपर्कात राहून पाणी सोडण्याचे नियोजन केले असते, तर ही परिस्थिती उद्भवली नसती. भाजपला जनतेची गरज फक्त मतांपुरतीच आहे, असा आरोप करतानाच मतांच्या राजकारणापलीकडे जाऊन सरकारने लोकांच्या जीवाची पर्वा करावी, असेही कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
महाराष्ट्राच्या पुरस्थितीकडे पंतप्रधानांचे दुर्लक्ष
राज्य आणि केंद्र सरकारने महाराष्ट्रातील पूरस्थितीकडे दुर्लक्ष केल्यामुळेच परिस्थिती एवढी गंभीर झाली आहे. महाराष्ट्रावर एवढे मोठे संकट आले असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्याप निवडणूक विजयातच मश्गुल आहेत. एरव्ही प्रत्येक गोष्टीवर ट्वीट करणाऱ्या पंतप्रधानांनी राज्यातील पूरस्थितीची अद्याप साधी दखलही घेतली नाही, याकडेही थोरात यांनी लक्ष वेधले.