आज रात्री अलमट्टीचा विसर्ग 5 लाख क्युसेक
कोल्हापूर (प्रतिनिधी) – पुरग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या कामास सर्वोच्च प्राधान्य दिले असून पुरग्रस्तांच्या बचाव आणि मदत कार्याला केंद्र व राज्य शासनामार्फत लागणारी सर्व ती मदत युध्दपातळीवर केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पुरग्रस्तांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी 60 बोटी उपलब्ध करुन दिल्या असून आणखीन जादा बोटी प्राधान्याने दिल्या जातील. कोल्हापूरातील पुरपरिस्थितीबाबत सातत्यपूर्ण केंद्र शासनाचा राज्य शासनाशी संपर्क असून पुराच्या पाण्याची पातळी कमी होण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी आजच चर्चा केली असून त्यांनी अलमट्टीचा विसर्ग आज सायंकाळपर्यंत 5 लाख क्युसेक करण्यास सहमती दर्शविली आहे. त्यामुळे पाण्याची पातळी कमी होण्यास मदत होईल. यापुढील काळातही या दोन्ही राज्यामध्ये आवश्यक तो समन्वय ठेवून पुर परिस्थिती नियंत्रणात आणण्यावर अधिक भर दिला जाईल.
पुरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यासाठी एनडीआरएफ, आर्मी, नेव्ही, गोवा कोस्टलच्या बोटी बरोबरच ओडिसा, पंजाब, गुजरात, गोवा या राज्याबरोबरच देशाच्या इतर भागातूनही जादा टीम मागविल्या आहेत.
घरात पाणी शिरलेल्या पुरग्रस्तांसाठी 10 ते 15 हजार हजार रुपये, पुरामुळे मयत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांसाठी 5 लाख रुपये तसेच पुरग्रस्तांना अन्नधान्याची मदत करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. प्राथमिक अंदाजानुसार पुरामुळे 67984 हेक्टरवरील कृषी पिकांचे नुकसान झाले असून याबाबतही प्रशासनाने तात्काळ उपाय योजना करण्याचे त्यांनी निर्देश दिले.