पुणे – चापेकर वस्ती परिसरात सुमारे चार ते पाच हजार नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांना प्राथमिक सुविधाही गेल्या अनेक वर्षांपासून मिळालेल्या नाहीत. लोकप्रतिनिधी या नागरिकांकडे दुर्लक्ष करत आहेत. या भागातील नागरिकांनी आपला परिसर समस्यामुक्त करण्यासाठी तसेच मूलभूत सेवांची उपलब्धता करून देण्यासाठी महाआघाडीचे उमेदवार दत्ता बहिरट यांना विधानसभेवर निवडून द्यावे, असे आवाहन माजी महापौर कमल व्यवहारे यांनी मतदारांना केले.
बहिरट यांच्या प्रचारासाठी चापेकरनगर, जवाहरनगर, आनंद, यशोदा सोसायटी परिसरांत पदयात्रा काढण्यात आली. यावेळी बहिरट यांच्यासह व्यवहारे यांनी मतदारांशी संवाद साधला. माजी नगरसेवक शिवा मंत्री, उदय महाले, प्रमोद सावंत, सुजीत हांडे, संजय मोरे, श्रीकांत भिसे, प्रमोद सावंत, सचिन पासलकर, अजीज सय्यद यांच्यासह महाआघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या परिसरात 4 ते 5 हजार नागरिक राहतात. नागरी सुविधांच्या समस्येने या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. सांडपाणी वाहून नेण्यासाठी स्वतंत्र गटारांची व्यवस्था नाही. त्यामुळे दुर्गंधीचा सामना करावा लागतो. कचरा अनेक दिवस साचून राहतो. तो वाहून नेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नाही. महापालिका व लोकप्रतिनिधींनी या परिसरातील कचरा टाकण्यासाठी स्वतंत्र कचराकुंडी उपलब्ध करून द्यावी. त्याचबरोबर या परिसरात पावसाचे पाणी साचून राहते. त्याचा त्रास आम्हाला होतो. गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीच्या कोंडीचा मोठ्या प्रमाणावर या परिसरातील रहिवाशांना होतो. त्याकडे कुणीही लक्ष देत नाही. असा समस्यांचा पाढाच या भागातील नागरिकांनी बहिरट यांच्यासमोर वाचला. त्यावेळी या समस्या गंभीर असून त्या तातडीनं सोडविण्यासाठी आपले प्राधान्य राहणार असल्याचे बहिरट यावेळी मतदारांशी बोलताना म्हणाले.