खासदार सुप्रिया सुळेंची गांधीगिरी : पुरंदरमध्ये दोघे आमने-सामने
सासवड- पुरंदर तालुक्यात गेल्या महिनाभरापासून सातत्याने होणाऱ्या अतिवृष्टीमुळे हजारो हेक्टर शेती क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात सतत होणाऱ्या पावसामुळे शेतकरी मेटाकुटीस आलेले आहे. दरम्यान, राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील पुरंदर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करीत होते. त्याचवेळी बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे याही पुरंदरच्या पाहणी दौऱ्यावर होत्या. हे दोघेही चांबळी येथील एका बांधावर आमनेसामने आले. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या फळभाज्यांचा बुके चंद्रकांत पाटील यांना भेट देऊन यातून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी करीत तालुक्यातील भयानक वास्तव व्यक्त केले.
तालुक्यातील या अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी (दि. 4) पुरंदर तालुक्यात दौरा केला. यामध्ये त्यांनी भिवरी, बोपगाव, हिवरे, चांबळी या भागातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या शेतात भेटी घेतल्या यावेळी त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना 100 टक्के पंचनामे करण्याचे आदेश दिले व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी तालुक्यातील फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी पंचनामे करताना महसुली अधिकारी फक्त हंगामी पिके व भाजीपाला यांचे पंचनामे करत असल्याची तक्रार केली त्यावर चंद्रकांत पाटील यांनी फळबागांना ही नुकसनभरपाई दिली जाईल, असे आश्वासन दिले. तर तालुक्यातील पंचनामे का रखडले? याबाबत पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती पालकमंत्र्यांवर केली. पुरंदर तालुक्यातील अद्यापही तब्बल 70 टक्के पंचनामे बाकी आहेत. महसुली अधिकारी हे शेतात चिखल असल्याचे व शेतात रस्ता नसल्याची कारणे पुढे करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
- विमा टोल फ्री नंबरवर प्रतिसाद नाही
पालकमंत्र्यांचा आजचा दिवसाचा संपूर्ण दौरा हा केवळ पाहणीत गेला. यामध्ये चंद्रकांत पाटील हे वारंवार विमा उतरवण्याचे आव्हान करत होते. यावर खळद (ता.पुरंदर) येथील चंद्रकांत कामथे या शेतकऱ्यांचे प्रधानमंत्री फसल विमा योजनेमध्ये रजिस्ट्रेशन आहे. या संबंधित शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ताही वेळेत भरलेला आहे. त्यांच्याकडे तशी कागदपत्रे उपलब्ध आहेत; मात्र तब्बल 15 दिवसांपासून हे शेतकरी या विमा योजनेच्या टोल फ्री नंबरवर संपर्क करत आहे; परंतु कोणताही प्रतिसाद दिला जात नाही. याबाबतीत पालकमंत्र्यांना विचारले असता त्यांच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. - जिल्ह्यातील 22 हजार 500 हेक्टर शेतीचे नुकसान
जिल्ह्यात एकूण 40 हजार शेतकरी हे अतिवृष्टीमुळे बाधित असून 22 हजार 500 हेक्टर शेतीचे अंदाजे नुकसान झाले आहे. यामध्ये भुईमूग, कांदा, भात, बाजरी, फळे व भाजीपाला या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, राज्य शासनाकडून सुरुवातीला तातडीने दहा हजार कोटींची तरतूद केली असल्याचीही माहिती चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.