नवी दिल्ली : देशभरात सर्वत्र कडाक्याची थंडी सुरु आहे. याच थंडीत काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ देखील तेवढ्याच जोशाने सुरु झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात भारत जोडो यात्रेत टी-शर्ट घालून फिरताना दिसत आहेत. पण, त्यांना थंडी का वाजत नाही नाही? यावर राहुल गांधींनी उत्तर दिले आहे. त्यातच आता उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी राहुल गांधींच्या थंडी न वाजण्याचे अजब कारण सांगितले आहे.
उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी,“राहुल गांधी आपल्या डॉक्टरांकडून थंडीबाबत संशोधन तर करत नाही ना? राहुल गांधींना थंडी न वाजण्यामागे कोणता जीवाणू आहे, याची आम्ही माहिती घेत आहोत. तसेच, राहुल गांधी हे खरे गांधी वाटत नाहीत. राजीव गांधी यांच्याबद्दल त्यांना काही माहिती आहे का?,” असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
तर ब्रजेश पाठक यांनी ‘भारत जोडो यात्रे’वर टीका केली होती. “देशात उभी फूट पाडण्यासाठी कारणीभूत असलेले ‘भारत जोडो यात्रा’ काढत आहेत. काँग्रेसने जातीवाद, परिवारवाद, संप्रदायवाद, दहशतवाद, नक्षलवाद वाढण्यासाठी प्रोत्साहन दिलं,” असेही ब्रजेश पाठक यांनी म्हटले.
दरम्यान, राहुल गांधींना थंडी न वाजण्यामागचे कारण विचारल्यावर ते म्हणाले, “मी थंडीला घाबरत नाही, त्यामुळे मला थंडी वाजत नाही. जे लोक स्वेटर घालतात ते थंडीला घाबरत असतात. त्यामुळे त्यांना थंडी वाजते. पण, माझ्याबाबत तसे नाही. माझी यात्रा मुळात भीतीच्या विरोधात आहे,” असं राहुल गांधींनी सांगितले होते.