सातारा – केंद्र व राज्य शासनाच्या महाआवास अभियानांतर्गत सातारा जिल्हा परिषदेने उल्लेखनीय काम केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी व प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई येथे गौरव करण्यात आला.
यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास आणि जलसंधारण विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते. जिल्ह्यातील 2020- 21 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत उल्लेखनीय कामाबद्दल जिल्ह्याला पाच पुरस्कार प्राप्त झाले. यामध्ये सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून पाटण तालुक्यातील नाव ग्रामपंचायतीला गौरविण्यात आले.
केंद्र व राज्य शासनाच्या गृहनिर्माण योजनांची अंमलबजावणीत गतीमानता व गुणवत्ता येण्यासाठी महा आवास योजना सुरु करण्यात आली आहे. या योजना प्रभावीपणे राबविणारा जिल्हा, तालुका व ग्रामपंचायतींना गौरविण्यात आले. 2020-21 मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेत विविध गटांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावित देशपातळीवर छाप पाडली आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी सुषमा देसाई तसेच पाटण ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.