हडपसर, दि. 24 (विवेकानंद काटमोरे) – महापालिकेत समाविष्ट नवीन गावांमध्ये नवे प्रभाग निर्माण होऊन नगरसेवकांची संख्या अधिक होणार होती. मात्र, आता संभाव्य नवीन रचनेत जुन्या प्रभागांना या गावांचा भाग जोडला जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे समाविष्ट गावांतील नगरसेवकांची संख्या कमी होणार आहे. याविषयी महापालिकेत समाविष्ट झालेल्या केशवनगर-मुंढवा, साडेसतरानळी, शेवाळेवाडी गावांतील काही राजकीय पदाधिकारी यांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. समाविष्ट गावांचा भार पुणे महापालिकेस उचलता येत नसेल तर शहराच्या पूर्व भागासाठी हडपसर महापालिका नव्याने निर्माण करावी, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. शासनाने सदर निर्णय घेतल्यास त्या-त्या गावांना स्थानिक नगरसेवक मिळून वेगाने विकास होऊ शकेल, असे मत अनेकांनी नोंदविली आहे. 2017 च्या निवडणुकीत महापालिकेची 160 सदस्य संख्या होती. 11 गावांचा महापालिकेत समावेश होऊन 11 गावांचा एक प्रभाग तयार करून केवळ दोन सदस्य निवडून आले. त्यामुळे पालिकेची एकूण सदस्य संख्या 162 झाली. पुन्हा नव्याने 23 गावे महापालिकेत समाविष्ठ होऊन तीन सदस्य प्रभाग पद्धतीत पालिकेत 4 नगरसेवक वाढणार आहेत. त्यामुळे समाविष्ट गावांतील “इच्छुकां’कडून नाराजी व्यक्त होत आहे.
राजकारणासाठी नागरिकांवर अन्याय करू नका. नवीन प्रभागात नगरसेवकांची संख्या 166 पर्यंत कमी होईल, असे कळते. समाविष्ट 34 गावांना यात कमी प्रतिनिधित्व मिळणार आहे. यातून ही गावे विकासापासून वंचित राहतील. प्रभाग तीन अथवा चारचा करा पण समाविष्ट गावांना योग्य प्रतिनिधित्व मिळायला हवे. तरच या गावांचा विकास होईल. अन्यथा, पुढची पाच वर्षे ठणठणाट.
– अशोक येवले, केशवनगर-मुंढवा
समाविष्ट 34 गावांवर अन्याय होणार आहे. ही 34 गावे प्रगतीपासून खूप लांब राहतील. सध्या, संबंधीत गावांचे नागरिकरण वेगाने होत आहे. त्यामुळे या ठिकाणी मूलभूत सुविधा पुरविण्यासाठीही निधी भरपूर लागणार आहे. तो निधी राज्य शासनाने देणे गरजेचे होते. परंतु, तो अद्यापही मिळालेला नाही किंवा मिळणार नाही.
– जितीन कांबळे, केशवनगर- मुंढवा
नव्या रचनेत प्रभाग रचना चारची केली जावी. याशिवाय सर्व प्रभाग समान संख्येचे असावेत. सध्या, असलेल्या प्रभागांनाच नवीन समाविष्ट गावची हद्द जोडून प्रभाग केल्यास येथे नगरसेवक संख्या वाढेल आणि खऱ्या अर्थाने समाविष्ट गावांतील विकासासाठी प्रतिनिधित्व मिळण्यास मदत होईल. निवडणूक आयोगाकडून योग्य ते निर्णय घेतले जात आहेत.
– संदीप लोणकर, केशवनगर-मुंढवा
संभाव्य नवीन प्रभाग रचनेनुसार सरासरी एक लाख मतदारांना एक नगरसेवक होऊ शकतो, त्यामुळे नगरसेवकांची संख्या नवीन गावांचा समावेश होऊनही घटलेली आहे. मुंबई प्रमाणे सर्व महापालिकेचे प्रभाग रचना सध्याच्या जनगणनेनुसार करावी. हा नियम लागू केल्यास त्या-त्या भागातील नगरसेवकांची संख्या वाढून स्थानिक नेतृत्व मिळेल.
– रमेश राऊत, केशवनगर-मुंढवा
2011ची जनगणना ग्राह्य धरून प्रभाग रचना केल्यास नगरसेवक संख्या कमी होणार आहे. पालिकेत नव्याने समाविष्ट गावांत 2011नंतर लोकसंख्येत झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे या गावांसाठी स्थानिक नगरसेवक असायला हवेत. सदस्य संख्या कमी राहिल्यास पूर्ण विकास साधण्यासाठी मर्यादा येतील. अन्यथा समाविष्ट गावांसाठी नवी हडपसर महापालिका करावी.
– राहुल शेवाळे, शेवाळेवाडी
नगरसेवकांच्या संख्येत सुमारे 7 ने घट होणार असल्याचे दिसते आहे. म्हणजे नगरसेवकांची संख्या 172 वरुण 166 एवढी होणार आहे. त्यामुळे पालिकेत समाविष्ट गावांना योग्य प्रतिनिधित्व मिळणार नाही. असे जर झाले तर या भागातील नागरिकांवर पुन्हा अन्याय होणार आहे. आजही या गावांना अगदी प्राथमिक सुविधाही मिळत नाहीत. कर मात्र भरमसाठ गोळा केला जात आहे. आणि म्हणून प्रभाग तीन अथवा चारचा करा परंतु समाविष्ट गावांना योग्य प्रतिनिधीत्व मिळालेच पाहिजे.
– देवेंद्र भाट, केशवनगर-मुंढवा
महापालिका निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाने “जैसे थे’चे आदेश दिले आहेत. आम्ही याचिका दाखल केली आहे. त्यावर अद्याप सुनावणी झालेली नाही. तरीही राज्य सरकारने नविन प्रभाग रचनेचे आदेश दिले आहेत. म्हणजे न्यायालयाचा अवमान करण्याची परंपरा हे सरकार कायम ठेवत आहे.
– संदीप तुपे, साडेसतरानळी
निवडणूक आयोगाने यापूर्वी झालेली प्रभाग रचना कायम ठेवावी. नविन रचनेत समाविष्ट गावांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळणे कठीण आहे. एकतर या समाविष्ट गावांसह इतर गावांची स्वतंत्र महापालिका करावी, असा निर्णय घेतला गेला तरी शहरालगतच्या गावांचा सुनियोजित विकास होणे शक्य होईल. अशी मागणी सुरवातीपासूनच आहे.
– राम खोमणे, केशवनगर
पुणे शहर म्हणून 2011च्या जनगणनेनुसार शहराची प्रभाग रचना होताना पालिकेत समाविष्ट 34 गांवानसह समान लोकसंख्येचे व मतदार संख्या लक्षात घेऊन करणे गरजेचे आहे. ज्यामुळे या भागांना योग्य प्रमाणात स्थानिक प्रतिनिधित्व मिळेल. परंतु, याकडे दुर्लक्ष करीत केवळ राजकारण लक्षात घेऊन प्रभाग रचना केली जात आहे.
– भूषण तुपे, साडेसतरानळी
नव्याने समाविष्ट झालेली गावे ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मानणारे असल्याकारणाने आताच्या सरकारने हा कुटील डाव खेळला आहे. यामुळे निश्चितच मोठी लोकसंख्या असलेल्या गावांन स्थानिक नगरसेवकांपासून वंचित राहावे लागणार आहे. याचा परिणाम या भागाच्या विकासावर खूप मोठ्या प्रमानावर होऊ शकतो. याचा विचार प्रामुख्याने करणे गरजेचे आहे.
– विक्रम शेवाळे, शेवाळेवाडी
महापालिका हद्दीलगत असल्याने या गावांच्या लोकसंख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे त्यामुळे पायाभूत सुविधा प्रत्येक नागरिकांपर्यंत देणे हे ग्रामपंचायतीला शक्य होत नव्हते. या कारणातून आताची गावे पालिकेत समाविष्ट करून घेण्यात आली. परंतु, स्थानिक नगरसेवक नसल्यास अशा गावांचा विकास होणार नाही. आयोगाकडून चुकीचे निर्णय होत आहेत.
– अशोक शिंदे, शेवाळेवाडी